रमाई :बाबासाहेबांची प्रेरणा - विजय वाठोरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 6 February 2021

रमाई :बाबासाहेबांची प्रेरणा - विजय वाठोरे



रमाई म्हणजे त्यागमूर्ती, कारुण्याची माता अन बाबासाहेबांची प्रेरणा होय.जिने आपलं पूर्ण आयुष्य आपल्या पतीसाठी,आपल्या संसारासाठी सदा धडपडीने आणि तळमळीने ,आपल्या तन मन धनाने कार्यतत्पर होऊन राबणारी स्त्री होय.रमाई होती म्हणूनच बाबासाहेब घडले.भीमराव दिवा होते तर रमा त्या दिव्याची वात होती आणि ही वात अविरतपणे बाबासाहेबांसाठी तेवत होती.बाबासाहेबांना प्रत्येक वळणावर ,प्रत्येक क्षणाला रमाईची साथ होती.रमामुळे बाबासाहेबांना संसारातील अडचणींना सामोरे जाता आले.
           रमा या भिकू वलंगकरांच्या कन्या.रमाला ३ बहिणी व एक भाऊ होता.थोरल्या बहिणीच लग्न झालं होतं आणि तिला दापोलीला दिलं होतं.लहानपणीच रमाची आई रुक्मिणीचे आजारपणाने निधन झाले.आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर याचा खूप मोठा आघात झाला होता.रमा चे वडील भिकू हे बंदरावर माशांनी भरलेल्या टोपल्या नेऊन देत असत.त्यांना छातीचा त्रास होता.तरीही भिकू आपल्या मुलांसाठी दररोज बंदरावर जायचे आणि माशांनी भरलेल्या टोपल्या नेऊन दयायचे.त्यांना आपल्या मुलांची खूप चिंता होती.अशातच रमा चे वडील भिकू यांचेही निधन झाले.रमा आणि तिचे भावंड पोरके झाले होते.रमा खूप समंजस अन कार्यतत्पर होती.तिला सर्व गोष्टींची जाण होती.त्यांचे लहान भाऊ व बहीण अजाण होते.त्यामुळे त्यांची जबाबदारी ही आता रमा वर आली होती.रमा ला जबाबदारी पेलण्याची बहुदा इथूनच धडे मिळाले.
     या पोरक्या मुलांना सावरण्यासाठी रमाचे काका व मामा पुढे सरसावले.रमाला आणि तिच्या भावंडांना घेऊन वलंगकर काका आणि गोविंदपूरकर मामा मुंबईला भायखळ्यात राहायला गेले.तिथे सुभेदारांच्या भीमरावां सोबत रमा चे लग्न झाले.लग्नाच्या वेळेस भीमराव १४ वर्षाचे अन रमा केवळ ९ वर्षाची होती.लग्न अगदी सादेच झाले.नंतर रमा भीमरावांच्या सावली बनून राहिल्या .भीमराव शिक्षणासाठी लंडन ला गेले असताना,रमा आपल्या संसारात दुष्काळाच्या आगीशी लढत होती.स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी होती.रमाने मोठ्या धेर्याने ,जिद्दीने आलेल्या संकटांना मात दिली.रमाने अनेक मरणे पाहिली.लहानपणी आई वडिलांचा मृत्यू,नंतर रामजी  सुभेदारांचा त्यापाठोपाठ बाबासाहेबांचे भाऊ आनंदराव अन आनंदरावांचा मुलगा,बाबासाहेबांची सावत्र आई जिजाबाई व त्यांची स्वतःची मुलगी इंदू व मुलगा बाळ गंगाधर या साऱ्यांचे मृत्यू रमाच्या मनात  दुःखाचे डोंगर करून बसले होते असे असतानाही तिने आपले कार्य प्राणपणाने अन तत्परतेने पार पाडले.
         बाबासाहेबांचे उच्च शिक्षण चालू होते,आणि रमा त्यांना कोणत्याही गोष्टीची जाण न होऊ देता संसारात होणारी वाताहत त्या झेलत होत्या.अगदी आपल्या राजरत्न या मुलांच्या मृत्यूचेही बाबासाहेबांना कळविले नाही.संसारात त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले.त्या एकट्या होत्या अन घर चालविण्यासाठी तिने अक्षरशः शेणाच्या गौऱ्या थापल्या.मुलांना खायला मिळायचे नाही म्हणून रमाने उपास तपास केले.सवर्णीयांना दिसू नये म्हणून त्या रातीला शेणासाठी वणवण भटकायच्या .शेण जमा करून गौऱ्या थापायच्या अन जी काही मिळकत आहे ती संसारासाठी अन बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी जोडून ठेवायच्या.परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या बाबासाहेबांना त्यांनी आपल्या दुःखाची झळ कधी पोहचूच दिली नाही.
         बाबासाहेब परदेशातून परतून आले तेंव्हा मुंबईच्या बंदरावर त्यांचे स्वागत करण्यासाठी जनता आली होती.बाबासाहेबांच्या जयजयकाराणे बंदर दुमदुमलं होत.रमालाही साहेबांच्या भेटीची ओढ होती.पण त्यांना नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेला भरजरी फेटा लपेटला अन त्या निघाल्या.पण त्यांनी दुरूनच साहेबांचे दर्शन घेतले.तरीही बाबासाहेबांची नजर रमावर गेलीच .साहेबांनी रमाला विचारलं रमा सर्वजण मला भेटत आहेस आणि तू अस दुरून का बरं,,रमाणे मोठ्या उदार मनाने उत्तर दिलं.तुम्हाला भेटण्यासाठी सारी जनता उत्सुक असताना त्यांच्या आधी मी भेटणे हे तर योग्य नाही.मी तर तुमची पत्नी तुम्हाला कधी भेटू शकते.
           अश्या उदार मनाच्या,करुणाशील अन शांत स्वभावाच्या रमाईंनी बाबासाहेबांना साथ दिली अन बाबासाहेबांनी ही रमा च्या कष्टाचे  चीज करत .परदेशात त्यांनी ज्ञानदान घेऊन बॅरिस्टर झाले.अठरा अठरा तास अभ्यास करून,प्रसंगी उपाशी राहून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले.आपल्या भारतात समता,बंधुता,धर्मनिरपेक्षता नांदण्यासाठी संविधान लिहिलं.पण या साऱ्याची प्रेरणा होती ती फक्त आणि फक्त रमाई ,,

-विजय नारायण वाठोरे(साहिल)
सरसम (बु) हिमायतनगर जि. नांदेड
9975593359

No comments:

Post a Comment

Pages