किनवट,ता.१६(बातमीदार):
सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव समिती व राष्ट्रीय सेवा योजने द्वारा ता.१४ रोजी पैनगंगा अभयारण्य पांढरकवडा विभाग अंतर्गत येणाऱ्या वन्यजीव विभाग खरबी, कोरटा आणि वन विभाग, किनवट यांच्या वतीने भारतात चित्ता या वन्यजीवाचे आगमन होत असल्याकारणाने युवकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी वन्यजीव व वनोपज याबाबत विविध प्रकारची शास्त्रीय माहिती देण्यात आली.प्राचार्य डॉ. आनंद भंडारे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. किनवट वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद राठोड, वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी विनायक खैरनार व नितीन आटपाडकर व (कै.) उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट चे समन्वयक प्रा. उमाकांत इंगोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
भारताततील मध्य प्रदेश या ठिकाणी चित्ता या नामशेष झालेल्या वन्य जीवाचे आगमन पुन्हा होत आहे. ५० च्या दशकात भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. परंतु, हा प्राणी पुन्हा भारतात आणण्यासाठी अनेक वर्षापासून चे चालवलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे.ता. १७ रोजी चित्ता भारतात आणला जात असल्याने त्याबाबत जनजागृती अभियान वनविभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. सरस्वती महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात विनायक खैरनार यांनी विविध वन्यजीव, सापातील प्रजाती याबाबत शास्त्रीय माहिती देऊन अशा प्राणी आणि सापांच्या अधिवासास नागरिकांनी जपले पाहिजे, असे आवाहन केले. चित्ता भारतात आणल्यानंतरतो भारतात टिकला पाहिजे. काही दिवसांच्या निरीक्षण व अभ्यासानंतर अजून भारतातील तसेच महाराष्ट्रातील काही गवताळ प्रदेशात सुद्धा तो आणला जाणार असून आपल्यासाठी ही अत्यंत सुखावह बाब आहे, म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपल्या कर्तव्याचा भाग समजून वन्यजीव व वनोपस वन संपत्तीचे जतन केले पाहिजे. यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सर्वजण हा संकल्प घेऊया, असे त्यांनी शेवटी आवाहन केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित (कै.) उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र या ठिकाणी वनसंवर्धन याविषयीचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून वन व वन्यजीव यांचे यांच्या संवर्धनाचा उपक्रम युवकांच्या वतीने चांगल्या प्रकारे राबविला जाईल, असे समन्वयक प्रा. इंगोले यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रमा मध्ये महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग राहील, असे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद राठोड यांनी केले. सूत्रसंचालन सुनील व्यवहारे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी अजय किती यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला व डॉ. रामकिशन चाटे यांनी आभार मानले. वन व वन्यजीव विभागाचे एस. एन. सांगळे, जी. टी. माजळकर,व्ही. बी. इंगळे, बी. टी. वाकडे महाविद्यालय अंतर्गत मूल्यांकन समिती प्रमुख प्रा. द्वारका प्रसाद वायाळ, प्रा. तपणकुमार , प्रा. विवेक चनमनवार, डॉ. मनोहर थोरात, प्रा. सुनील मिराशे, प्रा. ओमकार ढोले, प्रा .छाया उमरे यांच्यासह वन्यजीव विभाग व वनविभागाचे वनरक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment