मुंबई, : देशात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असलेल्या महाराष्ट्रात लॉकडाऊनची मुदत ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र सरकारने या लॉकडाऊनची मुदत वाढवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र केंद्र सरकारकडून लॉकडाऊनच्या मुदतवाढीची घोषणा होण्याआधीच राज्य सरकारने लॉकडाऊनला मुदतवाढ दिल्याची अधिसूचना जारी केली आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरूवारी मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीतच राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यावर सर्वांचे एकमत झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज राज्यातील लॉकडाऊनला मुदतवाढ दिल्याची अधिसूचना जारी केली आहे.
आज दिवसभरात केंद्र सरकारकडून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची केव्हाही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनला मुदतवाढ दिली असली तरी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची नियमावली अद्याप जारी केलेली नाही. केंद्र सरकार लॉकडाऊन-४ साठी कोणती नियमावली जारी करते, ती पाहूनच राज्यातील नियमावलीही तयार केली जाण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment