किनवट,दि.७ :शेतक-यांना पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतरही अनावश्यक मागणी केली जाणारी कागदपत्रे कमी करण्याच्या सूचना आमदार केराम यांनी किनवट व माहूरच्या सर्व बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकांना नुकत्याच दिल्या आहेत.
शेतक-यांना पिक कर्ज वाटप करणा-या बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या लेखी पत्रात आ. केराम यांनी सदरच्या सूचना दिल्या असून बँकांनी अकारण शेतक-यांना वेठीस धरु नये,असे पत्रात म्हटले आहे. गरीब व गरजू लाभार्थी शेतक-यांना दरवर्षी पिककर्ज वाटप करताना शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतरही त्यांच्या जमीनीचा ७/१२ उतारा, नमुना नं. ८ अ (होल्डींग), टोच नकाशा, फेरफार नक्कल व शपथपत्रे इत्यादी कागदपत्रांची अनावश्यक मागणी केली जात आहे. वास्तविक पाहता संबंधित शेतजमीनीचा टोच नकाशा व पिक कर्ज वाटपाच्या बाबतीत कोणताही संबंध नसताना या कागदपत्रांसाठी बँक शाखा शेतक-यांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे टोच नकाशा व इतर कागदपत्रांसाठी प्रत्येक कार्यालयात जनतेची अनावश्यक गर्दी निर्माण होवून प्रशासनिक बाबतीत प्रशासनावर अनावश्यक ताण पडत आहे. सध्या संपुर्ण देशात कोरोना या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने पिक कर्जासाठी वरील अनावश्यक कागदपत्रे कमी करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रांची मागणी कमी करून जनतेस व प्रशासनास सहकार्य करावे, अशा सूचना आमदार भीमराव केराम यांनी सर्व बँक शाखा व्यवस्थापकांना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment