नांदेड :
गेल्या 20 वर्षांपासून नांदेड विद्यापीठाशेजारी टेकडीवर असलेल्या रत्नेश्वरी मंदिर परिसरात मुक्ताबाईचा मुक्त संचार आहे. मंदिर परिसराची झाडलोट करायची, येणाऱ्या भाविकांनी किंवा पर्यटकांनी दिलेलं खायचं आणि रात्रीच्या वेळी बंद झालेल्या दुकानासमोर झोपायचं. ही मुक्ताबाईची दिनचर्या आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे, केसांची निगा न राखल्यामुळे केसांचा गुंता वाढला, त्याकडे दुर्लक्ष झालं. धूळ, माती साचुन हा गुंता वाढून शेवटी सर्व केसांची एकच वजनदार जट झाली. मानेला ओझं झालं. मान वळवायला त्रास, झोपेला त्रास, नीट झोपता येईना, कूस बदलता येईना. परंतु हा त्रास सहन करायचा असतो असा समाज रुढी परंपरेने करून दिलेला आहे. परंपरा नाकारली तर काहीतरी नुकसान होणार ही भीती मनात घर करून असते. जटा कापल्या तर देवीचा कोप होणार, काहीतरी अनर्थ होणार ही काल्पनिक भीती मुक्ताबाईच्या मनात देखील होती. सहलीसाठी रत्नेश्वरीला गेलेल्या महा. अंनिस नांदेडच्या जिल्हा प्रधान सचिव इंजि. रंजना यांनी ही भीती घालवली व मुक्ताबाईंना जट काढण्यासाठी तयार केलं. पण तिला हवा होता बुधवारचा मुहूर्त.
मुक्ताबाईची कौटुंबिक पार्श्वभूमी व इतर माहिती घेण्यासाठी तिची व तिच्या परिचितांशी कार्याध्यक्ष इंजि. सम्राट हटकर यांनी भेट घेतली. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही केलेल्या जटा निर्मूलनाचे व्हिडिओ आणि फोटो सर्वांना दाखवले. बरीच चर्चा झाली यात मुक्ताबाईंनी बुधवार मुहूर्ताचा आग्रह सुद्धा सोडला. "चांगल्या कामाला उशीर कशाला" असा विचार करत आम्ही शनिवार हा दिवस निवडला.
पूर्वसूचना असल्यामुळे तेथील सर्व दुकानदार हजर होते व पूर्ण सहकार्य करत होते. covid-19 पार्श्वभूमी लक्षात घेऊन सम्राट हटकर यांनी जटा कापायला सुरुवात केली. काही भाविक आणि पर्यटक हे डोकावून बघत होते. हा अनुभव मात्र फार वेगळा होता. केसांच्या मुळापासून जट तयार झालेली होती, अगदी त्वचेपासून. जट कडक व न वाळणारी होती. उवा होत्या, कीडे घोंगावत होते. जटेवर खालच्या बाजूला मुंग्या होत्या. डोक्यात जखमा (फोड) होत्या, त्यावर कापसाचे बोळे ठेवले होते. जखमा ओल्या असल्यामुळे बोळे जखमेवर राहत नव्हते. दुर्गंधी येत होती. कात्री खूप काळजीपूर्वक हाताळावी लागत होती. शेवटी व्यवस्थितपणे जट निघाली
मुक्ताबाईंना केसात असलेल्या लिखा, उवा, डोक्याला झालेली जखम, घोंगावणार माशा यातून मुक्त व्हायचं होतं. परंतु जट सोडल्यावर देवीचा कोप होतो. ही भीती इतरांप्रमाणे त्याच्या ही मनात होतीच. जट सोडणारा वेडा होतो, आंधळा होतो किंवा पटकी येऊन मरतो असाही एक समज करून दिला जातो. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेडच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन करून मुक्ताबाईला जटा मुक्त केले.
जट मुक्त झाल्यावर मुक्ताबाईंनी मान वळवून इकडेतिकडे बघितलं थोडं स्मित दिलं आणि खाली बघत महादेव तुमचं चांगलं करील असं म्हणाली. काही लोकं तर आम्हाला नेहमीच शिव्या देतात असं तिला सांगितलं. त्यावर ती म्हणाली "बेखूब लोक आहेत ते". कापलेली जट तिने एका नवीन कोऱ्या ब्लाऊज पीस मध्ये गुंडाळली. आता या जटेचं काय करणार? असं विचारल्यावर गंगाजीबापुला (गोदावरी नदीवर एक देवस्थान आहे) वाहणार असं तिने सांगितलं. निरोप घेताना तिची प्रतिक्रिया विचारली तेव्हा खूप हलकं वाटतं असं ती म्हणाली.
तेथील स्थानिक दुकानदार मधुकर अंभोरे, निर्मला काशिनाथ फुलारी, उत्तम भाले, शांताबाई झांबरे, शालिनी पेन्शनवार, चंद्रकांत, शोभाताई प्रकाश फुलारी, संजय भाले यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमात अंनिसचे इंजि. रंजना, युवा कार्यवाह प्रतिभा कोकरे, नितीन ऐंगडे, नांदेड शाखा सचिव श्रीनिवास शिंदे, माजी राज्य प्रशिक्षण सहकार्यवाह इंजि. आनंद बिरादार व इंजि. सम्राट हटकर यांनी सहभाग नोंदविला.
No comments:
Post a Comment