१०० खाटांच्या रुग्णालयाची मागणी किनवटची ; मंजुरी भोकरला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 10 July 2021

१०० खाटांच्या रुग्णालयाची मागणी किनवटची ; मंजुरी भोकरला

किनवट – आदिवासी,अतिदुर्गम भागातील गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांची मंजुरी देण्याची मागणी ३ वर्षांपूर्वी येथील आरोग्य सेवा संघाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.यावर फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला.परंतु,विद्यमान सरकारने गोकुंदाऐवजी भोकर उपजिल्हा रुग्णालयास १०० खाटांची मंजुरी दिल्याने किनवट तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.                                         नांदेड जिल्हा मुख्यालयापासून जवळपास दीडशे किलोमीटर दूर असलेल्या तसेच आदिवासी,दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या गोकुंदा ( किनवट ) उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे.यामुळे किनवट आरोग्य सेवा संघाने दि.१८ जुलै २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तालुक्याची वाढती लोकसंख्या,मुख्यालयापासूनचे जास्त अंतर,आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची होणारी फरपट थांबविण्यासाठी विशेष बाब म्हणून गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात ५० अतिरिक्त खाटांची मंजुरी द्यावी,अशी मागणी केली होती.यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करावा,असा शेरा प्रधान सचिवांच्या नांवे लिहिला.त्यानंतर १५ जानेवारी २०१९ रोजी आरोग्य सेवा संचालनालयाचे सहसंचालक डॉ.नितीन आंबेडकर यांनी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांवरून १०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्याबाबत विशेष बाब म्हणून प्रस्ताव अवलोकावा,असे नमूद करून लेखाशिर्षासाठी ७३३.७८ लाख रुपये अनुदान मंजूर करून वैद्यकीय अधीक्षक यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात यावे,असे पत्रही दिले.असे असताना दि.८ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गोकुंदाऐवजी भोकरच्या उपजिल्हा रुग्णालयात ३० वरून १०० खाटांची मंजुरी दिली.यामुळे किनवट तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. दुर्गम भाग उपेक्षितच राहणार – डॉ.बेलखोडे गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयींकडे आरोग्य विभागाचे नेहमीच दुर्लक्ष असते,असा आरोप मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ.अशोक बेलखोडे यांनी केला. दुर्गम,आदिवासी भागातील गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटा आवश्यकच आहेत. मागण्या पूर्ण करताना कोणते निकष लावले जातात ? खरीच गरज की,आपल्या मतदारांचे लांगूलचालन,याचा बोध होत नाही. विकास खरंच गरिबांसाठी आहे का? पालकमंत्री जिल्ह्याचे की, भोकरचे,असा संतप्त सवाल उपस्थित करून नियोजनाचा दुष्काळ असल्याने चुकीचे पायंडे पाडले जात आहेत.किनवट हा दुर्गम भाग उपेक्षित आहे,उपेक्षितच राहणार,याचेच हे चित्र असल्याची प्रतिक्रिया डॉ.अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Pages