शेतकऱ्यांची विज तोडून त्रास दिल्यास अधिका-यांना घेराव घालू ; किसान सभेचे अर्जुन आडे यांचा इशारा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 16 December 2021

शेतकऱ्यांची विज तोडून त्रास दिल्यास अधिका-यांना घेराव घालू ; किसान सभेचे अर्जुन आडे यांचा इशारा

किनवट, दि. १६  : नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे ऐन रब्बी हंगामात  विज कनेक्शन तोडू नये अन्यथा विज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिका-यांना घेराव घालू, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे  यांंनी सर्व संबंधितांना एका निवेदनाद्वारे नुकताच  दिला आहे.

अगोदरच अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकाला लागणारी विज खंडीत करून त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा ज्वारी गहू शेंगा या पिकांना पाणी देण्याचा मौसम असताना थकित विज बिलाच्या वसूली पोटी विज वितरण कडून शेतीपंपाचे कोणतीही पूर्व सूचना न देता गावागावातील विज कनेक्शन तोडून ट्रान्सफार्मर बंद केले जात आहेत,यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून रब्बी हंगामातील पीके वाळून जात आहेत. एकीकडे गावातील शेती पंपाच्या थकीत   विज बिलापैकी ६७% विजबिल माफ केल्याची घोषणा राज्य सरकारकडून केली असली तरी त्याची अमलबजावणी होत नाही. त्यातच उर्वरीत ३३ % विजबिल  भरणा करावा, असे परीपत्रक असताना सक्तीची वसूली करत असून नाही भरणा-या शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण पिके वाळून जात आहेत.

सक्तीची वसूली आणि राज्य शासनाची रोज बदलत असलेली विज जोडणी  संदर्भातील नियम यावरही आडे यानी टीका केली आहे. विज वितरण कर्मचारी सरसकट शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर बंद करून सक्तीची वसूली करत आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर होत आहे.  यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचे कामही हे जुलमी सरकार करत आहे, अशी टीका आडे यानी केली आहे.  विज वितरण अधिकारी  शेतकऱ्यांचे विज कनेकूशन तोडून त्रास देत असतील तर विज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारू व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊ ,असा इशारा आडे यानी निवेदनातून दिला आहे. सध्या विजकंपनीकडून राजरोसपणे शेतीचे कनेक्शन शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता तोडला जात असल्याने राज्य शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांतून असंतोष निर्माण झाला आहे. शिवाय खारिप हंगाम अतिवृष्टीने गेला तर रब्बी हंगाम शासनाच्या जुलमी वसूलीमुळे हातचा जाणार आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. या बाबीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून धिक्कार करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Pages