पुणे :
बजेटमध्ये समाजातील वंचित,शोषित उपेक्षित यांना न्याय मिळणे अभिप्रेत आहे, पण तसे होताना दिसत नाही. बजेटमध्ये कॉर्पोरेट अजेंडा दिसून येतो, त्यामुळे हे बजेट दोषपूर्ण आहे, असे मत संविधान फाउंडेशनचे प्रमुख तथा माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
संविधान फाउंडेशनच्यावतीने गेल्या वर्षभरापासून संविधानाची शाळा हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत संविधानाच्या बेचाळीसाव्या कार्यशाळेत ते बोलत होते. या शाळेत विकास वाहिनी या अंतर्गत खोब्रागडे यांनी बजेट संदर्भात मांडणी केली. या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले, बजेट स्पीचमध्ये मागासवर्गीय, अल्पसंख्यांक यांच्याबाबतीत काहीच बोलल्या जात नाही, त्यामुळे हे बजेट 85 टक्के असलेल्या बहुजन समाजासाठी फारसे हितकारक नाही.
बजेटमध्ये योजनांची नावे बदलून त्या नव्या योजना म्हणून सादर केल्या जातात. या योजनाचा फारसा उपयोग होत नाही. बजेटमध्ये अनुसूचित जाती यांचे साधारणता 40 हजार कोटी रुपये नाकारले त्यामुळे त्यांच्या विकासाला खीळ बसेल. बजेटमध्ये तरतूद केलेल्या रक्कमेचाही अयोग्य नियोजनामुळे व्यवस्थित वापर होत नाही. त्यामुळे मोठी रक्कम खर्चिक राहते. त्याचाही वंचित, उपेक्षितांना फटका बसतो.
बजेटमध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते ही प्राथमिकता असताना बजेटमध्ये जाणीवपूर्वक कॉर्पोरेट अजेंडा राबविला जातो. महाराष्ट्र सरकारही बजेटमध्ये मोठी कपात करत असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या पाच वर्षात अनुसूचित जाती -जमातीच्या बजेटसंदर्भात कायदा करण्याची मागणी आहे पण ती होत नाही हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.
काही नवीन करायचे झाल्यास अभ्यास करू असे राज्यकर्त्यांकडून उत्तर मिळते. याचा अर्थ त्यांना काही करायचे नसते, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
सरकारने अनुसूचित जाती जमातीसाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवायला पाहिजे ती दाखवली जात नाही, परिणामी या समाजाकडे शासनाचे दुर्लक्ष होते व त्यांचा विकास होत नसल्याचेही शेवटी ते म्हणाले.
प्रारंभी संविधान प्रास्ताविक वाचनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे,डॉ.बबन जोगदंड, रेखा खोब्रागडे, सदानंद कोचे, अनंत ताकवले, अजय ढोके, प्रकाश पवार,प्रियदर्शी तेलंग, डॉ.संजय दाभाडे, पुंडलिक थोटवे, राहुल भातकुले यांच्यासह समाजातील विविध घटकातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती खोब्रागडे यांनी तर आभार जीवन बच्छाव यांनी मानले.
No comments:
Post a Comment