किनवट,दि.19 (प्रतिनिधी) : राजर्षी शाहूनगर गोकुंदा येथील महावितरणचे ट्रान्सफार्मर(रोहित्र) जळाल्यामुळे विद्युतग्राहकांसाठी जी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती; त्यातून कमीअधिक दाबाने वीज पुरवठा होत असल्याने, अनेकांची विद्युत उपकरणे चालत नाहीत. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी नवीन ट्रान्सफार्मर तात्काळ बसवून देण्यासाठी येथील उपअभियंत्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केले की, 10 जुलै 2022 रोजी शाहूनगरमधील कविराज घुले यांच्या घराजवळील विद्युत ट्रान्सफार्मर जळून गेले होते. त्यामुळे त्या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी दुसर्या ट्रान्सफार्मरवरून पर्यायी पुरवठा करण्यात आला होता. मात्र त्यातून सातत्याने अनियमित दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने, अनेक ग्राहकांच्या घरातील पाण्याच्या मोटारी (पंप), रेफ्रिजरेटर (फ्रिज),मिक्सर आदी विद्युत उपकरणे चालत नाहीत वा बंद पडतात. फ्रिजमधील पदार्थ खराब होणे या समस्येसह बोअर वा नळाचे पाणी पंपाद्वारे भरणे दुरापास्त झालेले आहे. सदरील त्रास या भागातील नागरिक पाच दिवसांपासून सहन करीत असून, सूचना देऊनही अद्यापपर्यंत रोहित्र बसविण्यात आले नाही. नवीन रोहित्र जुन्या जागेऐवजी याच वस्तीतील मोकळ्या मैदानात असलेल्या विजेच्या खांबावर बसविण्यात यावा. जेणेकरून वस्तीतील लहान मुलांना त्यापासून धोका संभवणार नाही, अशी विनंती निवेदनात करण्यात आली असून, निवेदनावर शाहूनगरातील 29 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment