नांदेड - आंबेडकरी चळवळ ही लोकशाहीवादी चळवळ आहे. त्यामुळे टीका समीक्षा हे या चळवळीचे प्राणतत्त्व आहे. आत्मटिकेतून चळवळ विकसित व गतिमान होते, याचे सदैव भान ठेवून बी. व्ही. जोंधळे यांनी पत्रकारिता केली. म्हणूनच आंबेडकरी चळवळीची चिकित्सा करणारे त्यांचे लेखन चळवळीला दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड यांनी केले.
निर्मल प्रकाशनाच्या वतीने ज्येष्ठ मुक्त पत्रकार बी. व्ही. जोंधळे यांच्या 'आंबेडकरीत चळवळ- अंतरंग आणि अंतर्विरोध' या लेखसंग्रहाचे प्रकाशन सुरेशदादा गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अनंत राऊत होते तर याप्रसंगी मंचावर भदंत प्रा. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो व भदंत बुद्धभूषण हे उपस्थित होते.
पत्रकार बी. व्ही. जोंधळे म्हणाले की, मला चळवळ जितकी समजली तसे मी लिखाण केले. ते काही जणांना आवडले नाही. पण चळवळीवरील प्रेमापोटीच मी आजवर लेखन केले आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. अनंत राऊत यांनी आपल्या भाषणात आंबेडकरी चळवळी पुढील आव्हाने वाढली आहेत अशावेळी जोंधळे यांचे चळवळीचे चिंतन मांडणारे पुस्तक खूप उपयुक्त ठरणारे आहे असे सांगत शिस्तीचा अभाव, फाटाफूट यामुळे परिवर्तनाची चळवळ थंडावली आहे. या चळवळीला पुन्हा ऊर्जा देणारा हा लेखसंग्रह आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. तर प्रा. शा. द. जोंधळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास नंदन नांगरे, बाबाराव नरवाडे, सदाशिव गच्चे, विजय डोंगरे, अस्मिता जोंधळे, रत्नमाला राऊत, सदाशिव गच्चे, भीमराव राऊत, साहेब गजभारे, करुणाध्वज, अमृतचित्त, डॉ. अनिरुद्ध बनसोडे, प्रा. अशोक गेडाम, डॉ. संजय कसाब, प्रा. शिवाजी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ मुक्त पत्रकार बी. व्ही. जोंधळे लिखित 'आंबेडकरी चळवळ अंतरंग आणि अंतर्विरोध' पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून भदंत डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, सुरेशदादा गायकवाड,डॉ. अनंत राऊत,बी.व्ही.जोंधळे.
No comments:
Post a Comment