सव्वा वर्षात 1 लाखाहून अधिक नागरिकांनी ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन केले वैचारिक अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 April 2023

सव्वा वर्षात 1 लाखाहून अधिक नागरिकांनी ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन केले वैचारिक अभिवादन

 नवी मुंबई     :    नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर 15 येथे उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक देशापरदेशातील विविध स्मारकांपेक्षा अत्यंत आगळे वेगळे सर्वोत्तम ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय स्मारकाला भेट देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांप्रमाणेच लाखोंच्या संख्येने स्मारकाला भेट देणा-या सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहेत.


          सर्वसाधारपणे महापुरुषांचे स्मारक म्हणजे त्या महापुरुषाचा पुतळा व संबंधीत गोष्टी इतकीच संकल्पना दिसते.  तथापि हे स्मारक या पारंपारिक संकल्पनांना छेद देणारे स्मारक असून हे पुतळा विरहीत स्मारक येथील समृध्द ग्रंथालय आणि इतर अनेक सुविधा कक्षांमधून बाबासाहेबांच्या विचारांचे ठायीठायी दर्शन घडविते अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातील अनेक नामवंत विचारवंतांनी याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानांप्रसंगी जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत.


          5 डिसेंबर 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते स्मारकातील विविध अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण झाले होते. तेव्हापासून मागील 1 वर्ष 4 महिन्यांमध्ये म्हणजेच 12 एप्रिल 2023 पर्यंत 494 दिवसांमध्ये स्मारकाला देशापरदेशातून 1 लाख 12 हजार 826 इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली आहे व प्रत्येकाने या स्मारकाच्या वेगळेपणाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.


          स्मारकामध्ये बाबासाहेबांचे जीवनचरित्र दर्शन घडविणारे दुर्मिळ छायाचित्रांचे दालन, ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण इ- लायब्ररीसह समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक होलोग्राफीक आभासी चलचित्रप्रणालीव्दारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची सुविधा, एकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्यतम ध्यानकेंद्र, संविधानाविषयीच्या पुस्तकाचे विशेष दालन तसेच 250 आसन क्षमतेचे वातानुकुलीत प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या सुविधांनी हे स्मारक वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. रस्त्यावरून लांबूनच नजरेत भरणारा 50 मीटर उंचीचा भव्य डोम लक्ष वेधून घेतो. बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतिक म्हणून या डोमला पेनच्या नीबचा आकार देण्यात आलेला आहे.


          ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित ग्रंथावर पेन हाती धरलेली भव्यतम आकर्षक शिल्पाकृती हा या स्मारकाचा आत्मा आहे. याठिकाणी ज्ञानजागर व्हावा यादृष्टीने अगदी सुरुवातीपासूनच येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने ‘विचारवेध’ या शिर्षकांतर्गत आयोजित करण्यात आलेली आहेत. याशिवाय बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘जागर’ ही व्याख्यानमाला आयोजित करून बाबासाहेबांच्या प्रेरणादायी स्मृतींना वैचारिक आदरांजली अर्पण करण्याची परंपरा अव्याहत सुरु आहे.


          यामध्ये श्री. उत्तम कांबळे, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. सुखदेव थोरात, डॉ. रावसाहेब कसबे, श्री. गिरीश कुबेर, राजीव खांडेकर, श्री. हरी नरके, श्री. नागराज मंजुळे, श्री. अरविंद जगताप, श्री. बाबा भांड, डॉ. गणेश चंदनशिवे, श्री. योगीराज बागुल, डॉ. शरद गायकवाड, श्री. विजय चोरमारे, श्रीम. राही भिडे, श्री. नामदेव काटकर, श्री. सुरेश सावंत आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व्याख्याते सहभागी झाले आहेत.


          येथील व्याख्यान परंपरेतून नवी मुंबईची सांस्कृतिक शहर ही ओळख निर्माण होण्यासाठी भक्कम पाया रचला गेलेला आहे. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, पुस्तके वाचली जात नाहीत, व्याख्याने ऐकली जात नाहीत असे निराशावादी सूर एका बाजूला उमटत असताना स्मारकातील प्रत्येक व्याख्यानाला सभागृह हाऊसफुल्ल भरून सभागृहाबाहेर एलईडी स्क्रिन लावून थेट प्रक्षेपण करणे गरजेचे व्हावे एवढी श्रोत्यांची गर्दी होत असल्याचे काहीसे दुर्मिळ चित्र येथे पहावयास मिळत आहे.


          या सर्व व्याख्यात्यांनी तसेच देशाच्या विविध प्रांतातून स्मारकाला भेट देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचप्रमाणे नागरिकांनी हे स्मारक म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराचे मूर्तीमंत रुप असल्याचे वेळोवेळी म्हटले आहे. स्मारकाच्या DrAmbedkarSmark या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व शेअर चॅट या स्वतंत्र सोशल मिडीया पेज व त्यावरील एकाद्या पोस्टलाही नागरिकांचे हजारो अभिप्राय लाईक्स आणि कमेंट्सव्दारे प्राप्त होत आहेत.


          5 डिसेंबर 2021 रोजी लोकांसाठी खुले करण्यात आलेल्या या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, संविधान दिन, बौध्द पौर्णिमा अशा चारही दिवशी नागरिकांची 5000 हून अधिक उपस्थिती लाभलेली आहे. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी साधारणत: 250 हून अधिक नागरिक याठिकाणी भेटी देताना दिसतात. अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह स्मारकामध्ये येऊन बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांना सहकुटुंब अभिवादन करतात. अनेक ठिकाणच्या संस्था, मंडळे, समुह एकत्र येऊन स्मारकाची शैक्षणिक सहल आयोजित करताना दिसतात.


          याठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्यांप्रमाणेच देशाच्या विविध प्रांतांतून तसेच परदेशातूनही नागरिक या स्मारकाचे वेगळेपणे अनुभवण्यासाठी भेट देत असतात. विविध शाळा, महाविद्यालये आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली स्मारक दर्शनासाठी आयोजित करीत असून हे स्मारक बघताना विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह व बाबासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाबद्दल त्यांच्या मनात दाटून आलेला आदर त्यांना नवी प्रेरणा देताना दिसतो.


          3000 हजाराहून अधिक ग्रंथसंपदेने समृध्द असे येथील इ-लायब्ररी सुविधेसह अत्याधुनिक ग्रंथालय हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या व त्यांच्या विचारांचा जागर करणा-या पुस्तकांमुळे अभ्यासकांसाठी एक महत्वपूर्ण सुविधा आहे. याठिकाणी आलेला प्रत्येक माणूस भारावून गेला आहे व त्याने या स्मारकाचे वेगळेपण इतरांना भरभरून सांगितले आहे. त्यामुळे केवळ सव्वावर्षातच 1 लाखाहून अधिक नागरिकांनी याठिकाणी भेट देऊन, स्मारक पाहिल्यानंतर भारावून जाऊन या स्मारकाचा नावलौकीक सर्वदूर पसरविलेला आहे.


          त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी स्मारकाला भेट देणारी मोठी जनसंख्या विचारात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने हा जयंती उत्सव सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ते सर्व नियोजन केले आहे. तरी नागरिकांनी बाबासाहेबांना वैचारिक आदरांजली अर्पण करण्यासाठी जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.



No comments:

Post a Comment

Pages