सामंजस्यातून लेंडी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी संघर्ष समितीसह सर्वांची सहमती लेंडी प्रकल्पाबाबत जिल्हा नियोजन भवनात बैठक संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 4 May 2023

सामंजस्यातून लेंडी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी संघर्ष समितीसह सर्वांची सहमती लेंडी प्रकल्पाबाबत जिल्हा नियोजन भवनात बैठक संपन्न

नांदेड  दि. 4 :- लेंडी आंतरराज्य प्रकल्पाला मार्गी लावण्यासाठी लेंडी प्रकल्प संघर्ष समिती व प्रकल्पग्रस्तांनीही अधिक सकारात्मक होऊन या कामास सहकार्य केले पाहिजे. प्रकल्पग्रस्त गावाच्या पूनर्वसनाबाबत शासनाने जे निकष ठरवून दिले आहेत त्यानुसार आम्ही निधीच्या उपलब्धतेने कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. यात शासन व प्रकल्प संघर्ष समिती यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी प्रत्येक प्रकल्पग्रस्त गावासाठी समिती स्थापन केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. या समितीत गावचा तलाठी, ग्रामसेवक, शाखा अभियंता व गावातील पाच प्रतिनिधी यांचा समावेश असेल. या समितीच्या सचिवपदी जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंत्यावर जबाबदारी राहील, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.    


लेंडी प्रकल्पाबाबत आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके, संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, गुणवंतराव हंगरगेकर, प्रकल्पग्रस्त गावांचे सरपंच व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता व पारदर्शकता यावी यादृष्टीने गावपातळीवरील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये नायब तहसिलदार अथवा बिडीओ यांच्या अध्यक्षतेखाली समिती करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. पूर्नवसनासाठी ज्या सुविधा मंजूर आहेत त्या व्यतिरिक्तही इतर महत्त्वाच्या कामांसाठी शासनाने आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समिती / आमदार निधीतून याबाबत विचार करू असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.


लेंडी प्रकल्पाला झालेली दिरंगाई यामुळे केवळ या प्रकल्पाचा आर्थीक खर्च वाढला नाही तर शेतकऱ्यांनाही अतोनात नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. हा प्रकल्प वेळीच पूर्ण झाला असता तर पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथला शेतकरी व जमीन सुजलाम सुफलाम झाली असती, असे प्रतिपादन आमदार डॉ. तुषार राठोड यांनी केले.


पुनर्वसनाबाबत लोकांच्या अनेक अडचणी आहेत. गावात पायाभूत सुविधा नाहीत, हे लक्षात घेता या प्रलंबित प्रश्नांबाबत यथाशक्य इतक्या लवकर राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्यासमवेत स्वतंत्र बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याची हमी शासनाने दिली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो परंतू कोणत्याही परिस्थितीत संबंधित मंत्री यांचे समवेत जोपर्यंत बैठक होत नाही तो पर्यंत सुरू केलेले कामकाज तात्काळ स्थगीत करावे, असे आवाहन लेंडी प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव रावणगावकर यांनी केले.  यावेळी शेतकरी संघटनेचे गुणवंतराव हंगरगेकर व इतर सदस्यांनीही आपली भूमिका मांडली.



No comments:

Post a Comment

Pages