दुबई :
दुबईत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. दोघांच्या विचारधारेचा जागर घडवत, शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पाने हा प्रेरणादायी कार्यक्रम साजरा करण्यात आला.
आखाती देशांतील, विशेषतः दुबई येथील अनिवासी भारतीयांनी, समाज परिवर्तनाच्या महान विचारांनी प्रेरित होऊन महात्मा फुले यांची १९८ वी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी केली. हा भव्य सोहळा आंबेडकर इंटरनॅशनल मिशन यूएई' यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यात शिवाजी फाउंडेशन, दुबई' आणि 'सत्यशोधक विचारमंच, दुबई' यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.
यावर्षी कार्यक्रमाची थीम होती "सामाजिक परिवर्तनातून आर्थिक स्वावलंबनाकडे", ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विचारांना उजाळा देण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राहुल सोनपिंपळे, जे एक लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत हे होते.
डॉ. राहुल सोनपिंपळे यांच्या भाषणात ऐतिहासिक व विचारप्रवर्तक प्रवास उलगडला गेला. बुद्ध ते भक्ती या प्रवासाचे विश्लेषण करत त्यांनी समतेचा, न्यायाचा आणि शिक्षणाचा मूलभूत विचार मांडला. त्यांनी महात्मा फुले यांचे कार्य -विशेषतः महिलांच्या शिक्षणासाठीचा लढा, सत्यशोधक चळवळ आणि जातीव्यवस्थेविरोधातील संघर्ष यावर प्रकाश टाकला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधाननिर्मितीमधील भुमिका, आर्थिक व सामाजिक सुधारणांची दिशा यांचे अत्यंत प्रभावी विवेचन केले.
त्यांच्या भाषणातील मुख्य संदेश होता "माणूस म्हणून जगण्याचा अधिकार शिक्षणातून मिळतो." त्यांनी आंबेडकर विचारांवर आधारित नव्या पिढीतील जागरूकतेची गरज अधोरेखित केली आणि सामाजिक समतेसाठी संविधानाचा वापर 'हथियार' म्हणून करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी हेही नमूद केले की आपला लढा समाज बदलण्यासाठी आहे - सत्तेसाठी नव्हे, तर विचारांसाठी आहे.
पुढे बोलताना त्यांनी " ध्यानस्थ बुद्धापेक्षा कृतीशील, चालणारा बुद्ध हवा आहे." म्हणजेच, ध्यानात असणाऱ्या बुद्धाची प्रतीकात्मकता त्यांना नाकारायची नाही, पण आजच्या काळात समाजासाठी कृती करणारा, लोकांमध्ये वावरणारा आणि परिवर्तन घडवणारा बुद्धच अधिक आवश्यक आहे. याच संदर्भात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाची आठवण करून दिली ज्यांनी स्वतः बुद्धाचा पहिला चित्रांकित प्रतिमा अशी रेखाटली ज्यामध्ये बुद्ध डोळे उघडून कार्यरत अवस्थेत दाखवले गेले होते. हे फक्त श्रद्धेचे नव्हे, तर कृतीशीलतेचे प्रतीक होते.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की समाज परिवर्तन केवळ भाषणांमधून नाही, तर कृतीमधून घडते. त्यांच्या नेतृत्वाखालील टीम भारतातील वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. सामाजिक विहार, गुरुद्वारा आणि समाज मंदिरे हे शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित करून परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांनी उपस्थितांना या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. समारोप करताना त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 'आमची नवीन शैक्षणिक चळवळ गोर-गरिबांच्या मुलांसाठी परिवर्तनाची नवी दिशा ठरवणार आहे."
या भव्य सोहळ्याची सुरुवात बुद्ध वंदने ने झाली रक्षिता रंगारी, स्नेहल मंडपे, सारिका देवगडे, मेधा धुतले यांनी सुमधुर वाणीत वंदना केली. त्यानंतर उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून राष्ट्रनिष्ठेचा संदेश दिला पल्लवी मोहिते यांनी. त्यानंतर स्वागतगीत आणि बुद्धांच्या शिकवणीवर आधारित नृत्य आर्या सोनावणे आणि शारवी भगत यांनी सादर केले. अमोल देवगडे यांनी आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे कार्य व उद्दिष्टे विशद करत पे बॅक टु सोसायटी या तत्त्वावर भर दिला.
महिला सक्षमीकरणावर प्रीती बिर्हाडे यांनी विचार मांडले, तर सत्यशोधक विचार मंचाच्या देशमुख ताई यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शिवाजी काका ग्रुपच्या साक्षी मोरे यांनी कामगार महिलांच्या संघर्षाची मांडणी केली. या पहिल्या सत्राचे अध्यक्षीय समारोप संदीप कर्डक यांनी केले.
दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये भाषणे, गाणी, नाट्य व नृत्य सादर झाले. भारतातून आलेल्या भिकाजी घाटगे, प्रशांत भेले आणि गणपत कदम यांनी महापुरुषांच्या कार्यावर सादरीकरण केले. लहान मुलांच्या नृत्य आणि भाषण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. हृयुंक चावरे, प्रियांशी डेमरे, परमी भगत, वनिश्का मेश्राम, आनेरी देवगडे, आर्य शिरसाठ, आर्य भगत, समीप कदम, आर्यन ढोले, नैतिक कदम, रैयांश वैद्य यांनी नृत्य सादर केले. भाषणामध्ये राजवीर जगतकर, सान्वी सावंत, प्रत्यक्ष जिवाने, मिहिका यादव, अक्षय रंगारी, ईद्धान्त खोब्रागडे, दिव्यांषु खोब्रागडे यांनी सहभाग घेतला. नाटक सादरीकरण सयुरी पवार, समृद्धी मंडपे आणि विहान मंडपे यांनी केले.
आठ वर्षांच्या प्रनिल बनकर याने मला समजले फुले या विषयावर विशेष सादरीकरण करत प्रस्थापित व्यवस्थेला सवाल केला - महात्मा फुले यांच्या चित्रपटाला विरोध का होतो आहे? त्यांनी तर सर्व समाजाच्या शिक्षणासाठी आणि हक्कांसाठी लढा दिला. प्रनिलच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली वाघाडे आणि मंगेश वाघाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अनिल कदम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रदीप मोहिते, विकास जाधव, मोग्लान भगत, अतुल शिरसाठ, सारिका देवगडे, शुभजाधव, पल्लवी मोहिते, निकिता तायडे, योगिता शिरसाठ, लुम्बिनी यादव, सीमा वैद्य, विजय धुतले, शरद जाधव, डॉ. लिनेश खोब्रागडे आणि डॉ. पल्लवी कांबळे यांनी मोलाचा सहभाग दिला.
मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, अल- नाहदा येथील लॅव्हेंडर हॉटेल, दुबई येथे कार्यक्रम यशस्वीरीत्या हा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने दुबईतील भारतीय समाजाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत, तर जागतिक स्तरावर नवा प्रकाश देतात.
No comments:
Post a Comment