जालना - जालना जिल्ह्याचे भुमिपूत्र तथा प्रसिद्ध गीतकार प्रा. डॉ. विनायक पवार यांना शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाच्या वतीने मुंबईतील शाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात रविवारी ( दि. 1) आयोजित लोकरंग महोत्सवात खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते प्रा. डॉ. विनायक पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचे वडील हाबू पवार तसेच शाहीर दादा कोंडके यांचे भाचे पद्माकर मोरे, भाची सून माणिकताई मोरे, शाहीर दादा कोंडके यांचे नातू ॲड. अनिरुद्ध मोरे, महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाच्या प्रकल्प संचालिका दीपमाला लादे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी येथील रहिवासी असलेले प्रा.डाॕ. विनायक पवार हे रायगड जिल्ह्यातील पेण येथील डॉ.पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालय पेण जि. रायगड येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सासवड व उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित कवी म्हणून सहभाग नोंदविला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ख्वाडा तसेच बबन , छत्रपती शासन, लँड 1857, राजकुमार , फतवा, रुंदी, चौक, टीडीएस, रघु 350,नाद द हार्ड लव या चित्रपटांचे गीतलेखन केले आहे.प्रा.डाॅ.पवार यांनी रौंदळ या मराठी चित्रपटांसाठी संवाद लेखन व भूमिकाही केली आहे.याशिवाय नाद द हार्ड लव्ह हा चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीतेही त्यांनी लिहिली आहेत. चिवटी , ग्लोबल आडगाव , विरजण, गोवर्धन,उत, महाराष्ट्र फाईल्स, कलावती, दुनियादारी 2, येरे येरे पैसा 3, रुबाब आदी आगामी चित्रपटासाठी त्यांनी गीत लेखनही त्यांनी केले आहे.
प्रा. डॉ. विनायक पवार यांच्या नामुष्कीचे पिढीजात वर्तमान या काव्यसंग्रहाला आतापर्यंत लोक कवी विठ्ठल वाघ, विशाखा, गदिमा,एकता फाउंडेशन पुरस्कारासह एकून आठ पुरस्कार मिळाले आहेत.नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात बी.ए. च्या अभ्यासक्रमात त्यांच्या गीतलेखन या विषयावरील लेखाचा समावेश आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. च्या अभ्यासक्रमात पटकथा , संवाद या विषयावरील लेखाचा समावेश आहे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी. ए च्या अभ्यासक्रमात त्यांच्या एक व एम. ए. हिंदी विषयाच्या अभ्यासक्रमात दोन कवितांचा समावेश आहे. याशिवाय अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात त्यांच्या दोन कवितांचा समावेश असून मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. भाग एक अनिवार्य मराठी अभ्यासक्रमात एका कवितेचा समावेश आहे. इयत्ता10 वीच्या मराठी अभ्यासक्रमात माणसं पेरायला लागू या अनुवादित कवितेचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment