जयंतीपूर्व तयारीला वेग द्या; महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करा – नगरसेवक अभय नगराळे यांची मागणी
किनवट : आगामी एप्रिल महिन्यात साजऱ्या होणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण व परिसर स्वच्छतेची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी नगरसेवक अभय नगराळे यांनी किनवट नगर परिषदेकडे केली आहे.
यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नगराळे यांनी नमूद केले आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात विविध ठिकाणी जयंती सोहळ्यांचे आयोजन होणार असून मोठ्या संख्येने भीमसैनिक व नागरिक अभिवादनासाठी एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर शहराचे सौंदर्य आणि पावित्र्य जपणे आवश्यक आहे.
त्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा तसेच समतानगर येथील समाजमंदिराची रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जयंती काळात पुरेशी विद्युत व्यवस्था व आकर्षक रोषणाई करण्याचीही मागणी नगराळे यांनी केली आहे.
दरम्यान, या मागणीमुळे जयंती उत्सव समिती तसेच नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, नगर परिषदेकडून लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment