जोडीदाराच्या शोधात 'या' वाघाची 1300 किलोमीटर्सची भटकंती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 3 December 2019

जोडीदाराच्या शोधात 'या' वाघाची 1300 किलोमीटर्सची भटकंती

जोडीदाराच्या शोधात 'या' वाघाची 1300 किलोमीटर्सची भटकंती

विशेष: (3 डिसेंबर 2019)
         25 दिवसांमध्ये तब्बल 125 किलोमीटर्स पार करणारा 'आजोबा' बिबट्या सगळ्यांनाच अचंबित करून गेला होता. मेळघाटातला हा 'आजोबा' मजल-दरमजल करत मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत आला होता.

        या आजोबाचा रेकॉर्ड महाराष्ट्रातल्याच एका वाघाने मोडलाय. C1 नावाच्या या वाघाने 5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1300 किलोमीटर्सचं अंतर कापलं आहे.

       अडीच वर्षांचा हा नर वाघ शिकार, नवीन अधिवास किंवा जोडीदाराच्या शोधात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातल्या या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आलेली असल्याने या वाघाचा प्रवास 'ट्रॅक' करता येतोय.

      सुरुवातीला हा वाघ अभयारण्याच्याच जवळपासच्या शेतांतून, पाणवठ्यांजवळ भटकत होता. पण त्यानंतर मात्र त्याने हे सगळं ओलांडत प्रवास सुरू केला. हायवेही पार करत हा वाघ तेलंगणापर्यंतही पोहोचला होता.

       वाघांची लढाई : अवनीसह महाराष्ट्राने 2 वर्षांत गमावले 39 वाघ
'एक अवनी ठार झाली पण असे अनेक वाघ आहेत त्यांचं काय?'
आतापर्यंत फक्त एकदाच या C1 वाघाचा माणसांशी सामना झाला आहे. हा वाघ जिथं विश्रांती घेत होता, त्या झुडपामध्ये शिरलेल्या काही लोकांपैकी एकाला या वाघानं 'चुकून' जखमी केलं.

       महाराष्ट्रासोबतच तेलंगणातही भटकंती
टिपेश्वर अभयारण्यामधल्या T1 या वाघिणीला झालेल्या तीन नर बछड्यांपैकी C1 हा एक आहे. या टिपेश्वर अभयारण्यात 10 वाघ आहेत.

       फेब्रुवारीमध्ये C1 वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आली होती. त्यानंतर काही काळ हा वाघ अभयारण्य परिसरातच फिरत होता. पण नंतर मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळी 'स्वतःचं कायमस्वरूपी क्षेत्र' शोधण्यासाठी या वाघाचा प्रवास सुरू झाला.

      जूनच्या अखेरीस हा वाघ अभयारण्याच्या परिसरातून बाहेर पडला आणि तेव्हापासून त्याने महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यांसोबतच तेलंगणामध्येही भटकंती केलेली आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्याच आणखी एका अभयारण्याच्या परिसरात हा वाघ दिसल्याची नोंद करण्यात आली आहे.

       C1 वाघ सरळमार्गाने प्रवास करत नसल्याचं अभयारण्यातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दर तासाला उपग्रहाला जीपीएसद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या (GPS Satellite Information) आधारे या वाघाचा मागोवा घेण्यात येतोय. गेल्या 9 महिन्यांमध्ये तब्बल 5000 लोकेशन्सवर या वाघाच्या वावराची नोंद करण्यात आलेली आहे.

       "हा वाघ कदाचित क्षेत्र, अन्न आणि जोडीदाराच्या शोधात आहे. भारतातले वाघांसाठी अनुकूल असणारे बहुतेक प्रांत हे व्याप्त आहेत. म्हणूनच नवीन वाघांना स्वतःचं क्षेत्र निर्माण करण्यासाठी जास्त शोध घ्यावा लागतोय." वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ज्येष्ठ जीवशास्त्रज्ञ डॉ. बिलाल हबीब यांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितलं.

      हा वाघ दिवसा लपून राहतो आणि रात्री जंगली कबुतरं तसंच गुरांची शिकार करत प्रवास करतो. माणसांशी संघर्ष नाही
या वाघाने झुडपात शिरलेल्या एका व्यक्तीला जखमी केलं असलं तरी आतापर्यंत त्याचा माणसांशी फारसा गंभीर संघर्ष झाला नसल्याचं डॉ. हबीब सांगतात.

"हा वाघ आपल्या परसातून गेल्याचंही लोकांना कळंत नाही," ते म्हणतात.

      पण कोणताही 'अनुचित प्रकार' घडू नये म्हणून या वाघाला जेरबंद घेऊन त्याचं जवळच्या जंगलात पुनर्वसन करावं लागणार असल्याचं वनाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

5 महिन्यात 1300 किमी अंतर कापणारा सी 1 वाघ शिवाय या वाघाच्या रेडिओ कॉलरची बॅटरी 80% संपलेली आहे. त्यामुळे बॅटरी संपल्यास त्याच्यासोबतचा संपर्क तुटण्याची भीती आहे.

      भारतातली वाघांची संख्या जरी वाढलेली असलेली तरी त्यांचा अधिवास घटलेला आहे, त्यांना पुरेशी शिकारही मिळत नसल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

    एक वाघ ज्या परिसरात आहे तिथे जर प्राणीसंख्या 500 असेल तर त्या क्षेत्रात वाघासाठी पुरेसा अन्नसाठा (Food Bank) उपलब्ध असल्याचं म्हणता येईल, असं तज्ज्ञ सांगतात.

No comments:

Post a Comment

Pages