छ. संभाजीनगर दि.२५ : आणीबाणीला विरोध म्हणून 'संविधान हत्या दिवस' साजरा करून संविधान व लोकशाहीचा अवमान करणाऱ्या भाजप प्रणित केंद्र सरकारचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथे सायं.७ वाजता आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
आणीबाणीचा निर्णय १९७५ साली तत्कालीन पंतप्रधानांनी घेतले हे खरे असले, तरी त्यावेळचा घटनात्मक निर्णय भारतीय संविधानाच्या चौकटीत घेण्यात आला होता. आज ५० वर्षांनी त्या घटनेचा राजकीय द्वेषातून "संविधानाची हत्या" म्हणून उल्लेख करणे हा संविधानाचा आणि लोकशाही प्रक्रियेचा घोर अपमान असून ‘संविधान हत्या दिवस’ साजरा करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करून केंद्रशासनाच्या हुकूमशाही वृत्तीला चाप लावावा अश्या मागणीचे निवेदन मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना यावेळी ईमेल द्वारे पाठविण्यात आले.
संविधान हत्या दिवस साजरा करण्याच्या या कृतीतून केंद्र शासन एका विशिष्ट राजकीय पक्षावरील द्वेष व्यक्त करण्यासाठी संपूर्ण घटनात्मक प्रक्रियेचे अपमानकारक चित्र उभे करत आहे. ही भूमिका केवळ राजकीय बदला घेण्यापुरती मर्यादित न राहता, ती संविधानाच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असा आरोप करून सत्ताधारी भाजप निवडणूक आयोग, CBI, न्याय व्यवस्था, माध्यमे अशा लोकशाहीच्या स्तंभांवर दबाव आणून रोज संविधानाचा अवमान करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.
संविधानाच्या अंमलबजावणी ची जबाबदारी प्रत्येक सरकारची असताना सरकारच संविधानाचे मूल्य, संरचना आणि संस्थात्मक स्वायत्तता यांना केंद्र सरकार पायबंद घालत आहेत केंद्र सरकारच्या या निर्णयाकडे आपण गांभीर्याने लक्ष घालावे.
सरकारच्या या कृतीमुळे भविष्यात घटनात्मक प्रक्रियेवर संशय निर्माण होत आहे त्यामुळे अशा राजकीय कार्यक्रमांद्वारे लोकशाहीला हिणवले जाऊ नये म्हणून आपण सुसंगत भूमिका घ्यावी अशी मागणी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी सचिन निकम, राष्ट्रपाल गवई, रत्नदीप रगडे, बालाजी सोनवणे, निखिल आदमाने आदींसह रिपब्लिकन विद्यार्थी सेना, आईस्का, शाक्य संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment