महान समाजसुधारक संत गाडगेबाबा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 21 February 2020

महान समाजसुधारक संत गाडगेबाबा

महान समाजसुधारक संत गाडगेबाबा


          अंगावर चिंध्या, हातात गाडगे आणि खराटा, शरीरावर तेज, आवाज मेघासारखा, डोळ्यात,चमक, ध्यान सुंदर, कीर्तन अति सुंदर. असे संत गाडगेबाबा ज्यांना पाहायला मिळाले नाही त्यांचा जन्म व्यर्थ म्हणायचा. एक मुलखावेगळे व्यक्तिमत्व एखाद्या वादळासारखे महाराष्ट्रभर फिरले..
    देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षामाणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे २३फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे मुळचे नाव डेबूजी होते. पण त्यांच्या विचारांमुळे आणि अतिशय साध्या राहणीमुळे त्यांना गोधडी महाराज, चिंधेबुवा इत्यादी विविध नावांनी ओळखले जायचे.
   अंगावर चिंध्या, डोक्यावर गाडगे, हातात खराटा, शरीरावर तेज, आवाज मेघासारखा, डोळ्यात चमक,ध्यान सुंदर, कीर्तन अति सुंदर. असे गाडगेबाबा ज्यांना पाहायला मिळाले नाही त्यांचा जन्म व्यर्थ म्हणायचा. एक मुलखावेगळे व्यक्तिमत्व एखाद्या वादळासारखे महाराष्ट्रभर गाजले. असं गाजण्यासारखे बाबांच्याकडे होते काय, थोर घराणे,उच्च शिक्षण, शुध्द भाषा, अफाट वाचन, थोरांची संगत, कपड्यांची चमक, शरीर सौंदर्य की अफाट पैसा यापैकी बाबांच्याकडे काहीच नव्हते. तरी देखील गाडगेबाबा नावाच्या नराचा नारायण झाला कसा. खरं तर हा महान चमत्कारच म्हणायचा. पण विज्ञानयुगात चमत्कारास कोण मानणार .
   गाडगेबाबांच्या महान चमत्काराचे रहस्य म्हणजे त्यांनी अंगीकारलेला स्वच्छता धर्म, स्वच्छता धर्माचा सूर्य म्हणजे गाडगेबाना आजच्या युगात सर्वाधिक दुर्मिळ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्वच्छ माणूस.
   झिंगराजी जानोरकर यांचा मुलगा डेबुजी पुढे गाडगेबाबा होईल, हे कोणालाच माहित नव्हते. झिंगराजी परिवाराचं मुळ काम लोकांचे कपडे स्वच्छ ठेवायचे होते. पण लोकांच्या स्वच्छ कपड्यांच्या आत जर मळलेली मने असतील तर त्या स्वच्छ कपड्यांची किंमत शून्यच. बाहेरुन स्वच्छ कपडे परिधान केलेली माणसे अजून आतून अस्वच्छ असल्यामुळे माणसामाणसांत संघर्षाचे डोंगर उभे राहतात. माणसाने माणसाशी माणसांसारखे वागावे, हा विचार कृतीतून लोकांना पटवून देत होते.
   बाबा एक निरक्षर व्यक्‍ती होते पण साऱ्या माणसांवर प्रेम करण्याचा विद्येचा सुकाळ करावयाचा होता.त्यांना माणसांवरचे काय, पण ते गाय, बैल, कीटक, मुंग्या या सार्‍यांवर प्रेम करीत होते. या मानवतेवर प्राण्यांवर उगारणार्‍या हातापेक्षा सावरणारे हात श्रेष्ठ असतात. बाबांचे सारे जीवनच हातांच्या कामाचे जीवन होते. हातात खराटा घेवून लोकांच्या विकासासाठी सुंदर धर्मशाळा बांधणे हजारो लोकांच्या मुखी घास भरवणे हे तर गाडगेबाबांच्या हाताचे खरे महाकाव्य होय. माणसं काम केले की, पैसे मागतात. अखंड ५० वर्षे गाडगेबानांनी साऱ्या समाजाचे काम केले. एक पैसाही मागितला नाही. जेव्हा काम करूनही कामाचे पैसे मागीतले जात नाहीत त्यास सेवा म्हणतात. बाबांनी असा सेवाधर्म अखंड ५० वर्षे पाळला.
   खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करत लोकजागृती करणे हेच आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले.मला कुणी गुरु नाही आणि मी कोणाचाही गुरु नाही हींच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले.समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा, अस्वच्छता या समाजाच्या विरुंध्द गतीतून बहुजन समाज बाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपडअसे.हातात खराटा घेवून बाबा स्वतः गावाची स्वच्छता करून लोकांना धडा घालून देत असत.
   गाडगेबाबांच्या समाज कार्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी कधी फक्त उपदेश केला नाही तर स्वहस्ते प्रत्येक ठिकाणी सेवा करुन खेड्यापाड्यातील लोकांना स्वच्छतेचा राहणीमानाचा धडा घालून दिला. इतकेच नव्हे तर अनेकांना व्यसनापासून दूर केले. वागण्या  बोलण्याचे संस्कार दिले. त्यांचे सुधारणेचे एक स्वच्छ होते की, फक्त खेडोपाड्यातील रस्ते स्वच्छ करून चालणार नाही तर त्यातील प्रत्येकजण स्वच्छ, सुसंस्कारीत असावे. त्यासाठी बाबा आयुष्यभर झटले. त्यांनी स्वतःचे आयुष्य म्हणजेच लोकसंस्कारपीठ बनविले होते. असा हा महान समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त
त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन....

                                          श्रीकांत संभाजी मगर                                                        मो. ९६८९११७१६९

No comments:

Post a Comment

Pages