त्यागमूर्ती, ज्ञानसूर्याची सावली रमाई - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 7 February 2020

त्यागमूर्ती, ज्ञानसूर्याची सावली रमाई



त्यागमूर्ती ज्ञानसूर्याची सावली रमाई 

रमाई भीमराव आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी  १८९८ रोजी झाला तर मृत्यू २७ मे १९३५ रोजी झाला .  डॉ. बाबासाहेब आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत .रमाई (माता रमाबाई) म्हणतात . बाबासाहेब त्यांना रमा,रामू  असे म्हणत असतं .रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) आणि आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना तीन  बहिणी आणि  एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहचवत असेत .  रमा लहान असतानाच त्यांच्या आईचं  आजारपणानं निधन झालं .

 आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा आणि भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका आणि  गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले. तेव्हाच्या सामाजिक रूढी प्रमाण सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमरावसाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचं त्यांना समजलं  . सुभेदारांना रमाला पाहिले आणि त्यांना ती पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई आणि भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये  १९०६ मध्ये  झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचं  वय १४ वर्षे तर रमाईचं वय नऊ  वर्षे होतं . सध्याच्या सारखं लग्नात लग्न मंडप  ,  पंचपक्वान्नाचं  जेवण, झगमग रोशनाई असं काहीही नव्हतं . अतिशय साध्या पद्धतीनं  हे लग्न पार पडलं.

बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी १९२३ मध्ये  लंडनला गेले तेव्हा   रमाईना  खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या .  दुष्काळी परिस्थिती होती त्यात रमाई  होरपळत होत्या . बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हे हाल पहावले जात नव्हते  . त्यांनी काही पैसे जमा केले आणि  ते पैसै रमाईला देऊ केले  मानी स्वभावाच्या रामाईंनी त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत . स्वाभिमानी पतीच्या  त्या  स्वाभिमानी पत्‍नीनं  जिद्दीनं दुःखांशी , अडचणींशी गरिबीशी दोन हात करत होत्या . दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता आणि  प्रेरणास्थान म्हणजे रमाई होत्या . रामाईंनी अनेक मृत्यू  पाहिल्या .  मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू झाला होता .  १९१३  मध्ये  रामजी सुभेदारांचा मृत्यू झाला . इ १९१४ ते १९१७ दरम्यान  बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू . ऑगस्ट १९१७ मध्ये बाबासाहेबांच्या सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू . पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव  आणि आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू  . १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर आणि  १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला. परंतु बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना याबाबत फारसे त्यांनी कळविले नव्हते . परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. बाबासाहेब  परदेशात शिक्षणासाठी गेल्यानं  रमाई एकट्या पडल्या  . घर चालवण्यासाठी त्यांनी प्रसंगी  शेनाच्या  गोवर्‍या वाचल्या ,  सरपणासाठी वणवण फिरल्या . पोयबावाडीतून दादर  , माहीम पर्यंत  त्या जात असतं बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोकं त्यांना  नावं  ठेवतील म्हणून त्या  पहाटे सूर्योदयापूर्वी आणि रात्री आठ वाजल्यानंतर   गोवर्‍या थापायला वरळीला जात असतं . 

अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी आणि  त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी प्रदेशात अपार कष्ट घेत होते  . अर्धपोटी उपाशी राहून ते  १८-१८ तास अभ्‍यास करतं .
त्याच वेळी रमाईनं आपल्‍या निष्ठेनं  , त्यागानं आणि कष्टानं  स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी भरपूर मदत केली.
डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज मुंबई बंदरात मोठ्या संख्येनं  आला होता .
बाबासाहेब बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकारानं  बंदर परिसर  दुमदुमून गेला . अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभं राहून तो प्रसंग डोळेभरून पहात होत्या . दरम्यान ,  डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली अन ते रामाईच्या  जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाल्या ,  " तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नव्हतं . मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते ."

रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागतं , "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणतं . आलेल्याची रवानगी करताना त्यांचं  नाव, गाव, कामाचं  स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारं  एका नोंदवहीत टिपण्यास सांगतं .
एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर असताना  अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जाण्याचा प्रसंग आला तेव्हा  रमाईला एकटीला घरामध्ये कसे राहूं द्यावयाचे म्हणून बाबासाहेब धारवाडचे  त्यांच्या जवळचे मित्र वराळे यांच्याकडं   रमाईला पाठवले होते आणि काही दिवस तिकडेच राहावयास सांगितले.
वराळे काका   धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असतं . त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुलं  खेळायला येत असतं . एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुलं खेळायलाच आलीच  नाहीत  म्हणून रमाई वराळे काका यांना विचारले  " दोन दिवस झाली ही मुलं  कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही" . त्यावेळी वराळे म्हणाले , "ती लहान मुलं  दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुलं उपाशीच राहणार आहेत." हे सांगताना वराळे काकांचा  कंठ दाटून आला होता . त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोलीत गेल्या अतीव दुखणं त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले . त्याचं अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांनी कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे काकांकडे देवून म्हणाल्या ," तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून  लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी अजून तीन दिवस ही लहान मुलं  उपाशी राहिलेली  पाहू शकणार नाही ." 

 वराळे काकांनी  बांगड्या आणि डबा गहाण ठेऊन   लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू  घेवून येतात आणि लहान मुलं त्यावेळी पोटभरून जेवण करतात. मुलांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहू लागला  हे चित्र  पाहून रामाईंना  खूप आनंद झाला .त्यानंतर  हि सगळी  मुलं रमाबाई यांना "रमाआई" म्हणू लागले . आणि त्या क्षणा पासून रमाबाई या माता रमाई झाल्या .  त्या देशातील उपेक्षितांच्या आई झाल्या .
रामाईचं  शरिर काबाड कष्टानं पोखरुन गेलं  होतं .त्यामुळं त्यांचा आजार बळावला चालला होता. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार अधिकच वाढत गेला . मे १९३५ मध्ये तर त्यांचा आजार खूपच विकोपाला गेला. त्यावेळी बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण करून उपचार केले .  पण औषधोपचार  लागू होत नव्हते . एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असतं . बोलण्याचा प्रयत्‍न करीत असतं .  पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हातानं पाजण्याचा प्रयत्‍न करीत असतं . बाबासाहेबांच्या आग्रहामुळं रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असतं . त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली, अशीच सर्वत्र भावना होती . पहाडासारखे महामानव बाबासाहेब ढसाढसा रडत होते . जवळ जवळ एकोणतीस वर्षांच्या संसारात प्रेमानं  आणि धैर्यानं  भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून  परतीच्या वाटेनं कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या आपल्या जीवनात अगदी एकाकी झाले.

बाबासाहेब आंबेडकरांचं  रमाबाईंवर निस्सीम प्रेम होतं . रामाईंचे कष्ट पाहून त्यांचं  मन तुटायचं . त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचं शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिनं  मला दाखविली- जेव्हा मी नशिबानं लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक...’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.
 - यशवंत भंडारे, औरंगाबाद

No comments:

Post a Comment

Pages