किनवट येथे झालेल्या ८ व्या सामुहिक मुस्लिम विवाह मेळाव्यात ३३ जोडपी विवाहबद्ध - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 March 2020

किनवट येथे झालेल्या ८ व्या सामुहिक मुस्लिम विवाह मेळाव्यात ३३ जोडपी विवाहबद्ध

किनवट येथे झालेल्या  ८ व्या सामुहिक मुस्लिम विवाह मेळाव्यात ३३ जोडपी विवाहबद्ध

किनवट :  तन्जीम रेहनुमा-ए-कारवाँ  अल्पसंख्याक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने शुक्रवारी (दि.१३) शहरातील एन.के.गार्डन मध्ये आयोजित ८ व्या मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ३३ जोडपी विवाहबद्ध झाली.निकाहची प्रक्रिया काजी शब्बीर मौलाना यांनी पार पाडली.     
     आतापर्यंतच्या एकूण ८ विवाहसोहळ्यात तब्बल २५८  वधु-वरांना लग्नबंधनात बांधण्याचे कार्य येथील समाजसेवेची आवड असलेल्या मुस्लिम नवयुवकांनी उत्साह व निष्ठेने केले आहे. किनवट येथील  तन्जीम रहेनुमा-ए-कारवाँ या संस्थेच्यावतीने मुस्लिम समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील विवाह या मेळाव्यात केले जातात.यंदाच्या प्रत्येक नवविवाहित जोडप्यांना संस्थेकडून २० हजार रुपयाचे संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. शिवाय, वरातीसह आलेल्या जवळपास १० हजार पाहुण्यांची भोजनव्यवस्थाही संस्थेने केली होती. याप्रसंगी सामूहिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष शरफोद्दीन यांनी अविवाहित मुस्लिम नवयुवकांना विवाहासारख्या पवित्र बंधनात अडकताना हुंडा घेण्यासारखे पाप करू नका, प्रेषित महंमद पैगंबरांनी केलेल्या पवित्र उपदेशानुसार चालत, अत्यंत साधेपणाने विवाह करा,असे आवाहन केले.


    या मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आदिलाबाद येथून आलेले विशेष अतिथी मुस्तफा मौलाना, हाफिज शरफोद्दीन व मुफ्ती फेरोज साहब यांनी उपस्थितांना संबोधित केले. मंचावर शहरातील सर्व मशिदींचे इमाम उपस्थित होते. या विवाह सोहळ्यात माजी आ.प्रदीप नाईक, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, माजी नगराध्यक्ष इसाखान, व्यंकटराव नेम्मानीवार, अरूण आळणे, हाजी निसारखान, के.मूर्ती, साजिदखान,  प्रतीक केराम, पं.स.सदस्य नीळकंठ कातले, कॉ. गंगारेड्डी बैनमवार, बंडू नाईक, नगरसेवक अभय महाजन, जहीरोद्दीनखान, इमरानखान, श्रीनिवास नेम्मानीवार, शिवा आंधळे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष शेख मजहर, कृउबासचे सभापती अनिल पाटील कर्‍हाळे, पत्रकार शकील बडगुजर, सरपंच अमनभाई, नारायणराव सिडाम, अधिवक्ता तौफिक कुरेशी, जाफर चिखलीकर, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, शेख अली, सरू चिखलीकर, विजय पोलासवार, नागनाथ भालेराव आदींसह अनेकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन काजी सैफ मौलाना यांनी केले. आभार  सुलेमान मौलाना यांनी मानले.  विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी तन्जीम रहेनुमा-ए-कारवाँ या संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

Pages