बाबासाहेब देशभक्त होते काय? - अरविंद वाघमारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 18 October 2020

बाबासाहेब देशभक्त होते काय? - अरविंद वाघमारे

 



अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चातुर्वणावर आधारित समाजव्यवस्था मान्य नव्हती.  त्याऐवजी सर्व माणसे एक समान आहेत आणि त्यांना त्यांचे न्यायहक्क,अधिकार मिळाले पाहिजेत,जन्माने कोणाचे श्रेष्ठत्व ठरत नाही अशी त्यांची तळमळ होती . 

भारतात जन्माने कुणाचेही श्रेष्ठत्व ठरत नसून,कर्तृत्वाने ठरते यावर त्यांचा दृढ विश्वास होता.त्यामुळे हिंदू धर्म ही एक पायरी नसलेली उतरंड असल्याचे ते सांगत. या उतरंडीमध्ये परिवर्तनाला जागा नव्हती त्यामुळे बाबासाहेबांनी हिंदू धर्म सुधारणेचे आटोकाट प्रयत्न केले परंतु वारंवार केलेल्या सुधारणावादी आंदोलनानंतरही हिंदू धर्म बदलत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी येवला मुक्कामी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा केली आणि तब्बल एकवीस (खरंतर चोवीस) वर्षाच्या  विचारमंथनानंतर बुद्धांचा कल्याणकारी धम्म स्वीकारला. डॉ .बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या हयातीत राष्ट्राला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. 


मी प्रथमतःभारतीय आहे आणि अंतिमतःभारतीयच असा त्यांचा उद्घोष होता. त्याचवेळी महात्मा गांधी मात्र मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर हिंदू आहे असे म्हणताना आपल्याला दिसतात यातून दोघांच्या राष्ट्राकडे बघण्याच्या दृष्टिकोनातील फरक लक्षात यावा. माझा समाज आणि राष्ट्र यातून एकाची निवड करायची झाल्यास मी राष्ट्राला प्रथम पसंती देईल असे डॉ. बाबासाहेब मानत असत. ज्या समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत होते त्या  समाजाच्या हितापेक्षा राष्ट्रप्रेमासाठी तडजोड करण्याची त्यांची तयारी होती. त्यांना धर्म,भाषा,जात या कोणत्या घटकांपासून राष्ट्रीयत्व विचलित होणार नाही अशी प्रखर देशभक्ती हवी होती. अनेक मंडळी डॉ. बाबासाहेबांच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल सतत आक्षेप घेतात,त्यांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगावास भोगला का असा खोडसाळ प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास आवश्यक आहे का? किंवा देशभक्तीसाठी तुरुंगवास हाच एकमेव निकष आहे का? याबद्दल कोणी फारशी चर्चा करताना दिसत नाही. डॉ. बाबासाहेबांसमोर स्वातंत्र्याचे दुहेरी आव्हान होते एकीकडे विषमतावादी हिंदू धर्माच्या अक्राळविक्राळ जोखडातून तमाम शोषित वंचित अस्पृश्य समाजाला मुक्त करून त्यांना माणूस म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी लढायचे होते, संघर्ष करून त्यांना त्यांचे मुलभूत हक्क प्रदान करायचे होते.या संघर्षात तत्कालीन समाजव्यवस्था त्यांच्या विरोधात उभी होती त्यामुळे इंग्रज सरकारकडून समाजासाठी काही हक्कांना मागून घ्यायचे होते. 


गोलमेज परिषदेत अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाचा हक्क मागीतल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली ती लक्षात घेतली तर डॉ.बाबासाहेबांची कोंडी कोणालाही लक्षात येईल. तर दुसरीकडे त्यांना इंग्रजांच्या तावडीतुन भारताला स्वतंत्र कसे करता येईल आणि आपले स्वतःचे सरकार स्थापन कसे करता येईल या गोष्टींसाठी ते संघर्ष उभा करत होते हे दिसेल.


एकीकडे काँग्रेससारखी प्रबळ राजकीय शक्ती विरोध करत आहे तर दुसरीकडे इंग्रज सरकारही सनदशीर भांडत आहे,अशा परिस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेबांना तुरुंगास परवडणारा होता का? याचाही विचार झाला पाहिजे. डॉ.बाबासाहेबांचा संपूर्ण समाज त्यांच्या एका शब्दाखातर जीव देण्यासही तयार होता ज्या देशाला राष्ट्रीयत्वाची ओळख नव्हती त्या देशात सर्व नागरिकांना राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयत्वाच्या सूत्रात बांधण्याचे फार मोठे काम डॉ. बाबासाहेबांनी केलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते की, ब्रिटिशांकडून राजकीय स्वातंत्र्य आपण मिळवू पण भारतातील विषमतावादी सामाजिक रचनेमुळे सामाजिक स्वातंत्र्य कसे मिळणार? त्याचा विचारही आपल्याला करावा लागणार आहे.अन्यथा मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्याचा फायदा सर्वांना होणार नाही.या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा काँग्रेस पुढाऱ्यांनी विचारच केला नाही.त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे काँग्रेसच्या पुढाऱ्यांचे वैचारिक मतभेद झाले हे जरी खरे असले तरी ब्रिटिशांच्या मायभूमीत झालेल्या तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये डॉ. आंबेडकरांनी ठामपणे व अभ्यासपूर्ण मांडलेली स्वराज्याची भूमिका, सायमन कमिशन समोर दिलेली साक्ष, भारत देशाची घटना लिहून केलेले ऐतिहासिक कार्य,धर्मांतर करताना केलेल्या भारत देशाच्या अखंडतेचा विचार या सर्व बाबींचा जर कोणताही पूर्वगृह न बाळगता तटस्थ राहून अभ्यास केला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तुरुंगात न जाता कोणत्याही आंदोलनात सहभाग न घेता स्वातंत्र्याची लढाई लढले नसले तरी वैचारिकदृष्ट्या अभ्यासपूर्णपणे ते ब्रिटिशांसोबत अत्यंत मुत्सद्दीपण थेट भिडत स्वराज्यासाठी लढत राहिले हे कुणालाही नाकारता येणार नाही.


इंग्लंडमध्ये झालेल्या तिन्ही गोलमेज परिषदांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचा पुढारी म्हणून हजर होते अन दुसरीकडे गांधीजी डॉ. बाबासाहेबांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून मानायला तयार नव्हते.गांधीजींचे म्हणणे होते कि,मी संपूर्ण भारताचा प्रतिनिधी आहे,त्यामुळे अस्पृश्यांचा प्रतिनिधीही मीच आहे डॉ.आंबेडकर नव्हे,या वादावर दुसऱ्या गोलमेज परिषदेचे अधिवेशन गुंडाळले गेले.तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या अधिवेशनाला गांधीजींनी हजर राहून स्वराज्याची लढाई लढणे किंवा अखंड भारताची बाजू मांडणे ही त्यांची जबाबदारी होती असे असतानाही गांधीजींसह कोणताच काँग्रेसचा पुढारी तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या अधिवेशनाला हजर राहिला नाही त्यामुळे हे देशासाठीचे राष्ट्रीय कार्य बजावण्याचे कर्तव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकराना एकट्याला करावे लागले. तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या अधिवेशनात गांधीजी, नेहरू हजर राहिले असते आणि सर्वांनी अखंड भारताची बाजू जर मांडली असती तर  भारताचा इतिहास कदाचित फाळणीचा न राहता ऐक्याचा ठरला असता.


बाबासाहेबांनी तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या अधिवेशनात भारताचा दर्जा वाढविण्यासाठी ब्रिटिशांसमोर बुद्धिवादाची लढाई केली संपूर्ण भारतासाठी प्रांतात व केंद्रात दोन्ही ठिकाणी जबाबदारीच्या सरकारची मागणी त्यांनी केली. साऊथबरो कमिशन पुढे बाबासाहेबांनी जे निवेदन सादर केले होते त्या मध्ये भविष्यातील भारताच्या लोकशाहीची बीजे होती. अवघ्या पंचविशीत केवढी प्रगल्भता दाखवली होती त्यांनी ! पाच गोऱ्या दिग्गज ब्रिटिशांसमोर निर्भीडपणे मांडलेले मुद्दे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ज्ञानात भर पाडतील असे होते. डॉ. बाबासाहेबांनी आम्ही भारतीय लोक सरकार चालविण्यास सक्षम आहोत असे ब्रिटिशांच्या समोरच त्यांच्याच मायभूमीत ठामपणे मांडले. गांधीजींच्या अनुपस्थितीत डॉ.बाबासाहेबांनी मांडलेली स्वराज्याची भूमिका भारताच्या एकात्मतेची होती.गोलमेज परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या प्रभावीपणे बाजू मांडल्यामुळे गांधीजींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की तुम्हीच खरे देशप्रेमी आहात.


भारतीयांनी केलेल्या स्वराज्याच्या मागणीनुसार भारतीयांना कसे स्वातंत्र्य हवे याची चर्चा करण्यासाठी सायमन नावाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमधून शिष्टमंडळ भारतात पाठवले ते सायमन कमिशन होय.या कमिशनसमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिवादाने पटवून दिले की भारताला स्वातंत्र्य का दिले पाहिजे? याप्रसंगी त्यांनी दिलेली साक्ष ही भारताच्या भावी राज्यघटनेचा आराखडाच सायमन कमिशनवर सादर केला. 


सायमन कमिशनवर गांधीजींनी बहिष्कार टाकला पण काँग्रेसच्या काही नेत्यांनी उदाहरणार्थ श्रीनिवास अय्यंगार, सत्यमूर्ती यांनी सायमन कमिशनला भेटून आपले म्हणणे मांडले. काही इतर हिंदूविषयक,मुसलमान केसच्या पुढाऱ्यांनी आपापल्या प्रश्नांसाठी सायमन कमिशनची भेट घेतली असे असतानाही फक्त डॉ.बाबासाहेबांनी सायमन कमिशनला सहकार्य केले असे म्हणणाऱ्यापर्यंत काही नतद्रष्ट लोकांची मजल गेली. मुळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर दिलेली साक्ष वाचली किंवा त्यांनी सायमन कमिशनला लेखी सादर केलेले निवेदन वाचले तर भारताला कसे स्वातंत्र्य हवे याची घटनात्मक दृष्टीने बाजू मांडल्याचे लक्षात येईल. आता विचार करा,ज्यांच्या साम्राजाचा सूर्यच कधी मावळत नव्हता असे म्हणतात त्या बलाढ्य ब्रिटीशांच्या समोरच उभे राहून स्वातंत्र्याची थेटपणे निडरपणे मागणी करते ती व्यक्ती देशप्रेमी, देशभक्त, स्वातंत्र्यप्रेमी नाही तर काय आहे ????


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थानांच्या विलीनीकरणासाठी कायदामंत्री असताना जी मेहनत घेतली त्याकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही.संस्थाने स्वतंत्र असतील तर भारत एकसंघ राहिला असता काय?याचा विचार स्वातंत्र्यासाठी बाबासाहेब तुरुंगात गेले होते काय असा मूर्ख प्रश्न विचारण्याने जरूर करावा.हैदराबादचे संस्थान भारतात देऊ नये त्याला स्वतंत्र दर्जा मिळावा यासाठी निजामाने केलेला आटापिटा लक्षात घेतला तर संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न कदाचित आंतरराष्ट्रीय बनला असता नव्हे निजामाने तत्कालीन राष्ट्र संघात जाऊन तसा प्रयत्नही केला.परंतु बॅरिस्टर डॉ . बाबासाहेब आंबेडकर या देशाचे कायदेमंत्री होते त्यांनी संस्थानात लष्कर घुसवण्याच्या ऐवजी पोलिस ऍक्शन असा पर्याय दिला ज्यामुळे संस्थानांचे विलीनीकरण हा भारताचा अंतर्गत मामला बनला आणि केवळ तीन दिवसांत निजामाला शरण यावे लागले. आज हैदराबाद या देशाच्या नाभीस्थळावर जर निजामाचा झेंडा राहिला असता तर, स्वतंत्र आणि सार्वभौम भारताच्या अस्तित्वालाच कितीदा धक्के बसले असते याची कल्पना बाबासाहेबांच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी करावी.


भारताची राज्यघटना देण्याची जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर टाकण्यात आली. त्यांची प्रकृती स्वास्थ्य ठीक नसताना घटना समितीतील बहुतांश सदस्यांचे सहकार्य नसतानाही जगातील सर्व घटनांचा अभ्यास करून भारत देशाला एकसंघ ठेवणारी राज्यघटना लिहून देशावर असणारे प्रेम व्यक्त केले. घटना समितीतील शेवटचे भाषण करताना डॉ. आंबेडकर म्हणाले माझ्या शरीरात शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत मी देशाच्या एकात्मतेसाठी काम करीन. असे म्हणणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर किती सच्चे देशप्रेमी, देशभक्त, स्वातंत्र्यप्रेमी होते हे लक्षात येते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता काय? तुरुंगवास भोगला होता काय?असा प्रश्न करणारी उपटसुंभ डोकी वर काढतायेत.

No comments:

Post a Comment

Pages