५ व्या टप्प्यातील आंतरजिल्हा बदल्या पोकळ बिंदूवर कराव्यात व एम.एस.सी.आय.टी.साठी मार्च २०२१ पर्यत मुदतवाढ मिळावी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने आ.भिमराव केराम यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 13 December 2020

५ व्या टप्प्यातील आंतरजिल्हा बदल्या पोकळ बिंदूवर कराव्यात व एम.एस.सी.आय.टी.साठी मार्च २०२१ पर्यत मुदतवाढ मिळावी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने आ.भिमराव केराम यांना निवेदन

 



 किनवट,ता.१३ :    बिंदूनामावली नुसार रिक्त नसलेल्या प्रवर्गाच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होण्यासाठी ५ व्या टप्प्यातील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पोकळ बिंदूवर व्हावी व संगणक अर्हता मुदतवाढ मिळावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने *आ.भिमराव केराम* यांना नुकतेच देण्यात आले. 

    वरील मागण्यासंदर्भात संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व मंत्री व सर्व खासदार, सर्व आमदारांना निवेदन देण्याची मोहीम सुरू असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील ,राज्य सरचिटणीस हरिश ससनकर  राज्यकोषाध्यक्ष बालाजी पांडागळे ,राज्य उपाध्यक्ष जी. एस.मंगनाळे  सांगितले आहे.

      गेल्या १० वर्षात अनेक शिक्षक सेवानिवृत्त होऊनही काही जिल्हयात अजूनही काही प्रवर्गाच्या पदे अतिरिक्त दिसत आहेत. याला कारण ८ ते १० वर्षापूर्वी झालेल्या भरती प्रक्रियेत काही जिल्हयांत बिंदूनामावलीनुसार वस्तुनिष्ठ पदे प्रवर्गनिहाय न कळवल्यामुळे चुकीची भरती झाली, सन २०१३ - १४ मध्ये आर.टी.ई. अँक्ट निकषांनुसार अतिरिक्त ठरलेल्या अनेक मुख्याध्यापकांना अध्यापक पदावर पदावनत करण्यात आले, वस्तीशाळा शिक्षकांना रिक्त नसलेल्या प्रवर्गाच्या पोकळ बिंदूवर सामावून घेतले . इत्यादी कारणांमुळे सन २०१५ नंतर झालेल्या बिंदू नामावली पडताळीमध्ये काही जिल्हयात एखादा प्रवर्गाची पदे खूपच अतिरिक्त ठरली आहेत . खरे पाहता वरील सर्व कारणे ही पूर्णतः प्रशासकीय बाब असल्याने त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचा काही दोष नसताना त्यांच्या प्रवर्गाचे बिंदू अतिरिक्त दिसत असल्यामुळे त्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होऊ शकलेली नाही . 

      3 वर्षे सेवा झालेले ज्युनिअर शिक्षक बदली होऊन आपापल्या जिल्ह्यात परत गेले आहेत . मात्र १० ते १५ वर्षे सेवा होऊनही अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक आपल्या कुटुंबापासून दूर परजिल्ह्यात आहेत.

     हा अन्याय दूर होण्यासाठी वस्तीशाळा शिक्षकांना ज्याप्रमाणे नियमित केले त्या प्रमाणे आंतरजिल्हा बदली टप्या क्रमांक ५ मध्ये मागणी जिल्ह्यात पोकळ बिंदुवर आंतरजिल्हा बदली करुन भविष्यात रिक्त होणाऱ्या संबधित प्रवर्गाच्या बिंदूवर त्यांना सामावून घेण्यात यावे . असा धोरणात्मक शासन निर्णय व्हावा.यामुळे विविध जिल्हयात वेगवेगळ्या प्रवर्गातील बिंदू अतिरिक्त असल्याने सर्व प्रवर्गानां न्याय मिळेल.

      या बाबत राज्यातील रिक्त असलेली १०० टक्के पदे भरली जातील अशा हिशोबाने प्रथम शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करुन प्रतिक्षा यादी तयार करण्यात यावी, अतिरिक्त बिंदू किंवा १० टक्के रिक्त पदे यांचा विचार न करता बदली मागणीप्रमाणे संबधित जिल्हयातील रिक्त पदांच्या प्रमाणात ऑनलाईन आंतरजिल्हा बदली टप्पा ५ पूर्ण करुन सदर यादी प्रसिध्द करावी. वरील बदली यादीनुसार संबधित जिल्हयातून बदली झालेल्या शिक्षकांची आस्थापना कमी करुन ज्या जिल्हयात बदली झाली आहे तेथे आस्थापना धरुन सर्व जिल्ह्यांचा रिक्त पदांचा अहवाल पुन्हा मागवावा, तदनंतर जिल्हानिहाय आलेल्या रिक्त पदांच्या मागणीनुसार भरती प्रक्रियेतील प्रतिक्षा यादी  मधील शिक्षक संबधित जिल्हयात नियुक्ती देवून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे. आंतरजिल्हा बदलीवरील टप्यानुसार होणे तसेच जिल्हातंर्गत बदल्या ह्या २७/२/२०१७ च्या शासन निर्णयानुसार दर वर्षी करण्याच्या धोरणानुसार करण्यात याव्या, असे आवश्यक असल्याचे निवेदनात सांगितले आहे.

    वरील दोन्ही निवेदनांतील मागणीबाबत आ.भीमराव केराम यांनी लगेच शिफारस पत्र संबधीत विभागाकडे पाठवली आहेत.

     शिष्टमंडळात संघटनेचे   जिल्हानेते ग.नु.जाधव, तालुकाध्यक्ष राजकुमार बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा संघटक  किशोर कावळे , तालुका उपाध्यक्ष जगदिश मलगे आदी पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Pages