द्वेषभावनेचा त्याग करून मंगल मैत्रीचा विकास करा - भदंत पंय्याबोधी थेरो - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 18 March 2021

द्वेषभावनेचा त्याग करून मंगल मैत्रीचा विकास करा - भदंत पंय्याबोधी थेरो

नांदेड - माणसात विविध प्रकारचे विकार असतात. अहंकार हा एक असा विकार आहे की, त्यामुळे माणसातील विचारच नष्ट होतो. षडरिपुंचा नाश केवळ बुद्धाची जीवनपद्धती अंगिकारल्याने होऊ शकतो.  द्वेषभावनेचा त्याग केला तर मैत्रीभावना वाढीस लागते. माणसामाणसातील मंगल मैत्रीचा विकास झाला पाहिजे असे प्रतिपादन भदंत पंय्याबोधी थेरो यांनी मौजे खडकमांजरी येथे केले. ते धम्मसंदेश व धम्मदान यात्रेदरम्यान धम्मदेसना कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भंते संघरत्न, भंते धम्मकीर्ती भंते श्रद्धानंद भंते शिलभद्र भंते सदानंद यांच्यासह नवदीक्षित श्रामणेर भिक्खू संघ, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, धम्मदान व धम्मसंदेश यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे, सरपंच चांदोजी कापसे, उपसरपंच गणपत वाघमारे, ग्राम पंचायत सदस्य आनंदराव एडके, माजी सरपंच सुकेशिनी वाघमारे, पोलिस पाटील गौतम वाघमारे, माजी उपसरपंच चांदू एडके, पत्रकार विश्वनाथ कांबळे, धम्मचळवळीचे अभ्यासक देविदास एडके, सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.



          येथील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्र खुरगाव नांदुसा येथील बौद्ध भिक्खूंची धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे लोहा तालुक्यातील मौजे कोल्हे बोरगाव, जवळा देशमुख, खडकमांजरी या ठिकाणी आगमन झाले. खडकमांजरी येथे झालेल्या कार्यक्रमात पंय्याबोधी बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, मानवाला अनेक प्रकारची आसक्ती असते. त्यामुळे दुःखनिर्मिती होते. दु:खमुक्तीसाठी आसक्तीचा त्याग केला पाहिजे. तृष्णेवर मात करणे हेच बुद्धाचे तत्वज्ञान आहे. शिवणी जामगा येथील घटनेच्या अनुषंगाने ते म्हणाले की, अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे. विनाकारण कुणालाही त्रास होणार नाही असे वर्तन ठेवा. परंतु समाजात होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात पेटून उठले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी गणेश एडके यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. यावेळी भंते संघरत्न यांचीही धम्मदेसना पार पडली.



           धम्मसंदेश व धम्मदान यात्रा गावात आल्यानंतर बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका तरुण यांच्याकडून भिख्कु संघाचे जोरदार स्वागत झाले. पुरुष मंडळींनी पायघड्या अंथरल्या तर महिलांनी पुष्पवृष्टी केली. विधीवत भोजनदानानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प व प्रदिप पूजन करुन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. धम्ममित्र अनुरत्न वाघमारे व गंगाधर ढवळे यांनी याचना केल्यानंतर पंय्याबोधी थेरो यांनी उपस्थित उपासक उपासिकांना त्रिसरण पंचशिल दिले. त्यानंतर धम्मदेसना झाली. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन देविदास एडके यांनी केले तर आभार आत्माराम गायकवाड यांनी मानले. यावेळी आर्थिक दान व सर्व प्रकारच्या धान्याचे दान करुन उपासकांनी दान पारमिता केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारोती वाघमारे, संतोष वाघमारे, दशरथ एडके, परमेश्वर वाघमारे, मारोतराव जोंधळे, गंगाधर जोंधळे, भीमराव वाघमारे, हरी एडके, लिंबाजी गायकवाड, किशन वाघमारे, किशन वाघमारे, नारायण वाघमारे, किशन मेकाले, मारोती हंकारे, निवृत्ती वाघमारे यांच्यासह तथागत मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages