किनवट, दि.11, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या ‘महाडीबीटी’ या पोर्टलवर विविध शेतीविषयक योजनांसोबतच शेतकर्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणे देखील उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शेतकर्यांनी या पोर्टलवर जाऊन 15 मे पर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहे, अशी माहिती येथील तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडे यांनी दिली.
राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, शासनाने शेतकर्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली राबवायला सुरुवात केली आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे शेतकर्यांना त्यांच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी सोयाबीन,भात, तूर, मूग, उडीद, मका,बाजरी इत्यादी पिकांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे. यासाठी एका शेतकर्याला दोन हेक्टरपर्यंतच लाभ दिला जाणार आहे. अर्ज केल्यानंतर शेतकर्यांनी स्वत:च्या मोबाईल क्रमांकासह स्वत:चा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल, त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन आपल्या ‘आधार’ ची नोंदणी करावी.
सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करूनच त्यांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय अनुदान वितरित होणार नाही. यासाठी शेतकर्यांनी आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्रात जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकर्यांना काही तांत्रिक अडचणी आल्यास तालुका कृषी कार्यालयातील तांत्रिक पर्यवेक्षक यु.एस.जोंधळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
“ शेतकर्यांनी अनुदानावर बियाणे खरेदी करण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर ‘शेतकरी योजना’ या शिर्षकाअंतर्गत अर्ज करून लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर अधिकृत कृषी विक्रेत्याकडूनच बियाण्यांची खरेदी करावी. बियाणे खरेदी करतांना सोयाबीन बियाण्यासाठी 50 टक्के अथवा जास्तीत जास्त एक हजार 200 रुपये प्रति क्किंटलचा लाभ मिळणार आहे. सुधारित भात वाण हा दहा वर्षांच्या आतील असल्यास किमतीच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्किंटल या प्रमाणे लाभ मिळणार आहे. तसेच दहा वर्षाच्या वरील वाण असल्यास किमतीच्या 50 टक्के अथवा प्रति क्किंटल एक हजार रुपये याप्रमाणे लाभ घेता येणार आहे. तसेच कडधान्य पिकांतील तूर,मूग, उडीद या पिकांसाठी दहा वर्षाच्या आतील वाणासाठी किमतीच्या 50 टक्के अथवा पाच हजार रुपये प्रति क्किंटल या प्रमाणे व दहा वर्षाच्या वरील वाण असल्यास किमतीच्या 50 टक्के अथवा दोन हजार 500 रुपये प्रति क्किंटल प्रमाणे लाभ दिला जाणार आहे. मात्र देयके (बिल) घेतांना त्यावर वाणाच्या कालमर्यादेचा उल्लेख केलेले असावे. यासाठी शेतकर्यांनी बियाणे खरेदी करीत असतांना, पक्के बिल घेऊन त्यावर वाण दहा वर्षाच्या आतील विकसित वाण आहे की दहा वर्षावरील आहे, याचा कृषी विक्रेत्याकडून पक्क्या बिलावर उल्लेख करून घ्यावा.”
- बालाजी बी. मुंडे, तालुका कृषी अधिकारी, किनवट.
No comments:
Post a Comment