किनवट तालुक्यातील प्रकल्पांत 82.34 टक्के जलसाठा ; 21 पैकी नऊ जलाशय तुडुंब - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 August 2021

किनवट तालुक्यातील प्रकल्पांत 82.34 टक्के जलसाठा ; 21 पैकी नऊ जलाशय तुडुंब



किनवट, दि.07 : पाटबंधारे विभागाच्या किनवट उपविभागांतर्गत येणार्‍या 21 सिंचन प्रकल्पांपैकी नऊ जलाशय पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले असून, ओव्हर फ्लो झाल्यामुळे सांडव्यावरून पाणी वहात आहे. तसेच सहा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत तर उर्वरीत सहा पैकी चार प्रकल्प 50 टक्क्याच्या आसपास भरले असून, दोन मध्ये तांत्रिक दोष असल्यामुळे त्यात तीस टक्क्याच्या आतच पाणी साठलेले आहे. सध्या सर्व जलप्रकल्पांतील पाण्याचा उपयुक्त साठा  50.58 द.श.घ.मी. असून, त्याची टक्केवारी 82.34 टक्के आहे.

       किनवट तालुक्यात नागझरी,लोणी व डोंगरगाव येथील तीन मध्यम प्रकल्प, सिरपूर व मांडवी येथील दोन बृहत लघु तलावाशिवाय इतर 13 लघु तलाव व 3 साठवण तलाव आहेत. पावसासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे, किनवट तालुक्यात 24 जुलैला मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. तरीही आजपर्यंत सरासरीच्या 41.5 टक्के पाऊस जास्त पडलेला आहे. 25 जुलैच्या नोंदीनुसार तेव्हापर्यंत तालुक्यात 745 मि.मी.पाऊस पडला होता तर आजची नोंद 755.8 मि.मी. आहे. यावरून गेल्या 13 दिवसात केवळ 9.9 मि.मी.पाऊस पडलेला असल्याचे लक्षात येते.


      आजमितीस ज्या प्रकल्पात प्रत्यक्ष उपयुक्त जलसाठा आहे, त्याची आकडेवारी दशलक्ष घनमिटर मध्ये पुढील प्रमाणे असून, कंसातील आकडे त्याची टक्केवारी दर्शवितात. नागझरी-6.57(100.00), लोणी-8.02(95.70), डोंगरगाव-8.81 (100.00),सिरपूर बृहत-4.18(100.00) ,मांडवी बृहत-2.47 (48.03), कुपटी- 0.730(56.13), मूळझरा-1.81(100.00), थारा-0.860(100.00), निचपूर-0.92(41.81), जलधारा-1.87(100.00), सिंदगी-0.810(50.57), हुडी-1.57 (100.00), पिंपळगाव(कि.)-2.08(94.05), नंदगाव-1.13(75.35), अंबाडी-0.81(100.00), दरसांगवी-0.648(24.13), पिंपळगाव(भि.)-0.675 (29.58), सावरगाव-1.18 (89.92), निराळा सा.त.- 1.395(61.67),  सिंदगी सा.त.-2.31 (100.00),लक्कडकोट सा.त.-1.74(95.76).


      गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान चांगले असल्यामुळे लवकरच जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे, खरीपासह रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी पुरेल म्हणून शेतकरी वर्ग समाधानात आहे.  नागझरी या मध्यम प्रकल्पातील 1.5 द.ल.घ.मी.पाणी मात्र किनवट शहराच्या नळयोजनेद्वारे नागरिकांना पाणी पुरविण्यासाठी राखून ठेवल्या जाते तर निराळा, लक्कडकोट व सिंदगी येथील साठवण तलावामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होते व त्यातील पाणी जनावरांना पिण्यासाठी व नागरिकांना वापरण्यासाठी राखून ठेवल्या जाते. नऊ जलाशये शंभर टक्के भरल्यामुळे त्यांच्या आऊट फ्लामुळे नदी-नाले चांगलेच भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीनाल्याकाठच्या  विहिरीतील पाणीपातळीत वाढ होत असल्याने अनेक शेतकर्‍यांची चिंता मिटलेली आहे.

No comments:

Post a Comment

Pages