महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय पातळीवर फुले, शाहु, आंबेडकर चळवळीत कवी गायक व संगीतकार म्हणून ज्यांनी आपल्या लेखणी व आवाजाने समाज प्रबोधनाचे ,मनोरंजनाचे व ज्ञानाचे बीज रोवन्याचे काम केले ते अविस्मरणीयच म्हणावे लागेल.शाहीर सुदेश कांबळे यांचा जन्म पुण्याचा. पुण्यनगरीत वावरताना विद्देच्या माहेरी विविध पैलू आत्मसात करता आले.वडील रेल्वेत नोकरीला असल्याने त्यांचा सहवास त्यावेळचे ख्यातनाम गायक गोविंद म्हसीलकर यांच्याशी जवळुन संमंध आला. लहानपणा पासून डान्सिंग पार्टी व मेळ्यात गाणी गाता गाता त्यांनी भीम जयंतीत मातब्बर गायकांचे कार्यक्रम पाहिले व ऐकले या कालावधीत त्यांची भगवान लोंढे यांची भेट झाली व गायन कलेचे संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली.हळु हळु काळ जसा सरकत गेला तसे ते कलेच्या प्रवासात प्राविण्यमय होऊन गेले.जेमतेम बारावी पर्यंत शिक्षण घेऊन त्यानी आपले जीवन चळवळीत झोकून दिले. पुढे वैवाहिक जीवन जगतांना त्यांची लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याशी भेट झाली.व त्यांना गुरु मानुन स्वतः कार्यक्रम करण्याची दिशा मिळाली.गल्लीपासून दिल्ली पर्यंत शासनामार्फत अहोरात्र कार्यक्रमाची नांदी गायली.लोकगीतासह पोवाडा,भारुड, लावणी व अभिनयाची छाप असल्याने गीतांचे शब्द जनमानसात रुजवल्या गेले.एवढा मोठा कलाप्रवास व अनुभव पाठीशी घेऊन ते परीपक्व गीतकार झाले.त्यांची गीतरचना समाजातील व बाहेरील कलावंत आवडीने गाऊ लागले.ते स्वतःउत्तम हार्मोनियम वादक असल्याने त्यांना मोठ मोठ्या दिग्गज गायकांना साथ करण्याची संधी मिळाली.त्यात प्रल्हाद शिंदे, नवनीत खरे, भिकाजी भंडारे, लक्ष्मण राजगुरू,भीमप्रीय दलितानंद बाबा, प्रभाकर पोखरीकर इत्यादींचा सहवास जवळुन लाभला.पुणे, मुंबई,कोकण, विदर्भात अनेक गायक गायिका यांच्या सोबत साथ कलण्याचा योग आला.कला प्रवास सुरु असताना पुण्यात साधना मेश्राम,प्रा.प्रज्ञा इंगळे यांच्या गायकीने शब्दांना न्याय दिला. तसेच प्रकाशनाथ पाटणकर,सरवर जानी कव्वाल व पुण्याचे गायक राहुल शिंदे यांनी गाणी रेकॉर्ड केली.तसेच मराठवाड्यातील गायिका सुनिता किर्तने, मंजुषा शिंदे यांना गायणाचा मोह आवरता आला नाही.
बुद्ध, फुले,शाहु, आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांची शंभर गाणी असणारा त्यांचा गीत संग्रह लवकरच प्रकाशित होतोय.त्यांनी भगवान बुद्ध, फुले,शाहु , आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक गीते लिहिली.
आपल्या गीताच्या माध्यमातुन दु:ख निवारण्या या जगताला धम्मचारिकेतुन नवा मार्ग दावणारा मला चालता बोलता बुद्ध हवा आहे असे सांगतात
दु:ख निवरण करण्या येथे विश्वाच्या वैभवा
मला चालता बोलता बुद्ध हवा रे
मला चालता बोलता बुद्ध हवा||धृ||
शांतीमय ते करुणाकारी पिंपळाचे पान
या पानाने उजळुन गेले सर्वस्वी अज्ञान
धम्मचारिकेतुन जगताला मार्ग दावण्या नवा||१||
तसेच रामजींचं कबीरी घरानं होतं हे पुढील गीतातून सांगतात-
रामजी पिता वाची सोता पोथी अन पुराणं
कबीरी घरानं त्यांचं कबीरी घरांनं||धृ||
ते विधिचं विधान आणि भक्तीला उधान
मानवी कल्यानाचं त्यांनी शोधीलं निदानं
विषमतेचं जातीप्रथेचं रचीलं सराणं
घेऊन बुद्धाला बरोबर या गीतातुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीची ते आठवन करुन देतात-
स्वयंप्रकाशित सूर्य उगवला उभ्या या धरणीवर
घेऊन बुद्धाला बरोबर आले भीमराव आंबेडकर
नागाच्या भुमीवर,समता ममतेचं आगरं
विश्व शांतीचा वर करी धम्माचा जागर
बहुजनांच्या हितासुखाचे नवे राखा घरं
अशा एकापेक्षा एक सरस रचना प्रबोधनासाठी तत्पर आहेत.युट्युबवरही त्याची आंबेडकरी गीते, कोळी गीते नामवंत गायकांनी गायलेली आपणास ऐकायला मिळतात. त्यांनी अनेक चित्रपटासाही गीते लिहिली आहेत.आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते ए ग्रेडचे गीतकार आहेत.शासनाचे दारुबंदी,एड्स जनजागृती,लेक शिकवा,लेक वाचवा,पाणी वाचवा, पर्यावरण रक्षण ई.कार्यक्रमातुन त्यांनी जनजागृती केली.अंधश्रद्धा निर्मुलन या लघु चित्रपटात ही त्यांनी भुमिका साकारली.
त्यांची मनपसंत गीते
१)मानवी बुद्धीवादाची
तत्वनिती बुध्दाची
साद घालते बुध्दीवाद घालते
ही पंचशिला गाथा बोलते
२)बाबाच्या शब्दाचे मोल कळाया लागलं
जग बुध्दाच्या वाटेवर आज वळाया लागलं
३)का नेसली पैठणी...
४)ऐकुन घे भावा कसा घडलाय भीवा
ही गोष्ट रक्ताच्या नात्याची हाय
शिकवन रामजी पित्याची हाय
त्यात मेहनत मिरा आत्याची हाय
५)रमा भीमसख्याची कांता
धारवाडला विसावयास जाता
मुले वसतीगृहातील पहाता
धान्यांची होती चिंता
दिल्या काढून बांगड्या सोन्याच्या
मिटविला प्रश्न तो खाण्याचा
पुरस्कार
गाणं रत्न पुरस्कार-दलित
रंगभुभी
महाराष्ट्र भुषण मा.रामदासजी आठवले यांच्या हस्ते.
अनेक मंडळांनी व संस्थानी प्रशस्ती पत्र देऊन गौरव
संदेश
शाहीर सुदेश कांबळे यांनी आपल्या प्रबोधन कार्यातून आजतागायतअहोरात्र महापुरुषांच्या विचारांची पेरणी केली.ते विचार बहुजन समाजाने आचरणात आणावे, महापुरुषांच्या जयंत्या नावापुरत्या न करता परिवर्तन घडावे नवीन कलाकारांना घडविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करावी जेणेकरून पुढील प्रबोधन चळवळीला गती येईल असा संदेश देतात.त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद.
- महेंद्र नरवाडे,किनवट(नांदेड)
मो.न.७०६६६५०३६६.
No comments:
Post a Comment