पर्यावरण संवर्धन कृती संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती-प्रणाली चिकटे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 29 November 2021

पर्यावरण संवर्धन कृती संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती-प्रणाली चिकटे

 


किनवट, दि.२९ :  पर्यावरण संवर्धन आणि  महिला सशक्तीकरण जनजागृती आणि सामान्य जनजीवनातील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आपण कृती संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करीत आहोत,अशी माहिती यशदा, जलसाक्षरता विभागा अंतर्गत  प्रशिक्षित जलदूत प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे,राहणार पुनवट(ता. वणी, जि. यवतमाळ) यांनी आज पत्रकारांशी  संवाद साधताना दिली.

   आज(दि.२९)सकाळी १० वाजता त्यांनी साने गुरुजी रुग्णालयाच्या सभागृहात डॉ. अशोक बेलखोडे यांच्या उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

  सभोवतालील, दिवसेंदिवस बदलती उपभोगवादी जीवनशैली, वाढते प्रदूषण, तापमानवाढ, अनिश्चित पाऊस , वातावरणदल, ऋतुचक्रबदल, यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या, इतर वाढत्या स्थलांतराच्या समस्या लक्षात घेता, सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व ग्राऊंड लेव्हल वर काम करणारी व्यक्ती, समूह यांना भेटी देणे व जनजागृती उद्देश ठेवून  माहिती पोहचविणे, शक्य तितकं लोकांशी समस्याबाबत  चर्चा करणे, संवाद साधत त्या- त्या भागातील परिस्थिती समजून घेणे, पर्यावरणाबाबत  मानसिकतेचा अभ्यास करत लोकल परिस्थिती समजून घेत आहे,असेही त्या यावेळी बोलतांना म्हणाल्या. 

     पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की. हा प्रवास आपला महाराष्ट्र जवळून अनुभवण्याचा, जगण्याचा, स्वतः चे स्त्री मुक्ती चे अस्तित्व शोधण्याचा प्रवास आहे. आपण सर्वसाधारण कोरडवाहू शेतकरी कुटुंबातील आहोत. प्रवास हा माझा व्यक्तिगत आहे. कुठल्याही शासकीय किंवा संस्थेमार्फत निघाली नसून, सोबत ना कोणाची प्रवासाला स्पॉन्सरशिप आहे.  माझा प्रवास स्वजबाबदारीचा  असून लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत आर्थिक सह्योग सुद्धा लोकच करतात. प्रवास करत १ वर्ष जास्त झाले (३९८ दिवस). १५ हजार ७०० कि. मी. पेक्षा जास्त चा प्रवास झाला आहे. प्रवासात लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. अशा कोविडच्या काळातसुद्धा सहकार्य मिळते आहे. सोबत पर्यावरण हा विषय सर्वांच्या जाणिवेचा असल्याने प्रत्येक टप्प्यावर पोलीस वर्ग सुद्धा सहकार्य केले आहे. त्यामुळे प्रवास सुरक्षितरीत्या सुरू आहे. माझ्यामुळे कोविडचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊनच माझा प्रवास सुरू आहे,असेही त्या म्हणाल्या. 

   माझ्या या सायकल प्रवासात लोकांना सांगत असलेली काही संदेश  -ज्याचा संकल्प मी स्वतः घेतला असून, प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे काळाची गरज आहे. आपल्या आरोग्यासाठी वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी, मोटारगाडीचा वापर टाळून, शक्य ती स्थानिक कामे सायकलने करू या, प्लास्टिक आणि बाटल्यांचा वापर टाळू यात. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बॉटल सोबत ठेवू या, परिसरात स्थानिक, देशी झाडे लावू या व जगवू या. अनावश्यक वस्तूंच्या गरजा टाळून, अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करू या, आपला परिसर आपणच जबादारीने स्वच्छ ठेवूयात आणि आपले आरोग्य सुधारू या, 'पाणी बचत व पाणी जिरवा' या कामात सहभाग घेऊ या. घरचा अनावश्यक सुरु असलेला नळ काळजी पूरक बंद करूया, कोळसा उत्खनन आणि ऊर्जा निर्मिती साठी ६० % प्रदूषण होते. म्हणून अनावश्यक विजेचा वापर करणे टाळूया, माणसाला जगण्यासाठी पोषक, संतुलित अन्न पाहिजे पण आज जे मिळत नाही. म्हणून विषमुक्त शेती कडे वळूया, या सर्व प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त व्यक्तींना सहभागी करू या.आणि स्वतः च्या कृतीतून संस्कार पुढे नेऊया,असा संदेशही त्यांनी बोलतांना दिला.

No comments:

Post a Comment

Pages