आंबेडकर चळवळीचे मुक्त विद्यापीठ महाकवी वामनदादा कर्डक -यशवंत भंडारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 15 May 2022

आंबेडकर चळवळीचे मुक्त विद्यापीठ महाकवी वामनदादा कर्डक -यशवंत भंडारे

वामन तबाजी कर्डक हे वामनदादा कर्डक नावानं प्रसिद्ध होते... हे मराठी शाहीर, कवी , गीतकार,गायक  आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ...  त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते...  दादांनी डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्यावर  दहा हजाराहून  अधिक गीतं रचली आहेत....


लोकशाहीर वामन कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे काम केले. तथागत बुद्ध , महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होतं ... हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा आयुष्याच्या शेवटापर्यंत देशभर फिरत राहिले...  याशिवाय वामनदादा यांनी समाजातील अपप्रवृत्ती , नेत्यांनी आंबेडकरवाद आणि समाजाची केलेली प्रतारणा यावर घणाघात करत  समाज जागृतिचं माझी ते अविरत करत राहिले ... 


वामनदादा कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ मध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मधील देशपंडी या छोट्याशा गावात झाला ...  वडील तबाजी कर्डक, आई सईबाई, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री असा वामनदादांचा परिवार होता...  त्यांच्या घरी १८ एकर शेती होती... धान्य घरात यायचे तरीही हंगाम संपला की त्यांच्या आई  डोंगरात जाऊन लाकडं गोळा करून मोळी बांधून ते जळतण सिन्नर बाजारात विकायच्या ...  वडील टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकायचे आणि  हेडीचा धंदा करायचे...  सर्वांनी कष्ट केल्यावरही आषाढ श्रावणात आबाळ व्हायचीच ... कधी तरवट्याची भाजी तर  माठाची भाजी ... कधी कोरडी भाकरीच खावी लागायची... 


वामनदादा यांनी लहान असताना   गुरे चारणे ...  जत्रेत कुस्त्या खेळणे... शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणं ...  मातीकाम, सिमेंट कॉंक्रीटचे काम, चिक्की विकणं , आईसफ्रूट विकणं , खडी फोडणं , टाटा ऑईल मिलमध्ये नोकरी अशी विविध  कामं केली...  त्यांना वाचनाचा खूप छंद होता...  त्यांना नाटकांचीही आवड होती ...त्याचं मुळं त्यांनी  #लल्लाटलेख या नाटकात #घुमा ची भूमिका केली होती... 


वयाच्या १९-२०व्या वर्षी वामनदादा यांचं  लग्न अनुसया नावाच्या मुलीशी झालं ...  पुढे त्यांना मुलगी झाली तिचं नाव   मीरा असं ठवलं ... वामनदादांचे जीवन फार सुखात गेले नाहीत ... बायको अनुसया त्यांना सोडून गेली ...तर पुढे आजारपणात मीराचंही निधन झालं ... मिराच्या निधनानं ते खूप व्यथित झाले ...   मीराचं  दुःख वामनदादा कधीही विसरू शकले नाहीत...


 

मीराच्या निधनानंतर रोजगाराच्या शोधत वामनदादा  आईसोबत  मुंबईत आले... मुंबईत  त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केलं ... कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला... चिक्की विक्रीचा, आईस फ्रूट विक्रीचाही व्यवसाय  केला ... वामनदादा यांनी मुंबईत मिळेत ते काम केलं ... नंतर त्यांना टाटा कंपनीत नोकरी मिळाली... शिवडीच्या बीडीडी चाळीत राहत असतांना ते समता सैनिक दलात सामील झाले... इथपर्यंत वामनदादांना अक्षरांचा परिचय नव्हता...


एकदा त्यांच्या चाळीमधील एका व्यक्तीनं  वामनदादांना पत्र वाचायला सांगितले... पण दादांना हे पत्र वाचता लिहिता आलं नाही ... त्यामुळं त्यांना खूप वाईट वाटलं ...- शिक्षण नसल्यामुळं आपण लिहू-वाचू शकत नाही हे त्यांना अवघड वाटू लागलं आणि   एव्हढेच नव्हे तर त्यांना यामुळं रडूही कोसळलं ...त्यानंतर त्यांनी देहलवी नावाच्या मास्तरांकडून बाराखडी, मुळाक्षरे शिकली...  जोडाक्षरं तर त्यांनी दुकानांच्या  पाट्या, बोर्ड वाचून शिकले...  हळू-हळू त्यांचं  लेखन  , वाचन वाढू लागलं ... सोबतच ते विविध खेळही खेळायचे आणि व्यायामही करायचे ...


त्याच काळात  आंबेडकरी चळवळ सर्वत्र वेगानं जोर धरू लागली होती... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते... त्यावेळी वमनदादा बाबासाहेबांच्या सभेला उपस्थित राहत असतं ... समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देतं...  नायगाव येथे १९४३ मध्ये  वामनदादा  कर्डक यांनी बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिलं होतं ...


आता वामनदादा कर्डक यांचं मराठी आणि  हिंदी भाषेतील वाचन बरेच पुढं गेलं होतं ... याचवेळीं  त्यांना चित्रपट कथाकार, अभिनेता व्हायची खूप ओढ लागली होती... त्यासाठी त्यांनी  अनेक चित्रपट कंपन्यांचे उंबरठे जिझवले होते ... त्यांच्या या जिद्दीमुळं त्यांना मिनर्व्हा फिल्म कंपनीत एक्ट्रा म्हणून काम करण्याची संधी  मिळाली होती .... ते कारदार स्टुडिओ, रणजीत स्टुडिओ यांमध्येही कामाला जायचे...  जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणी बागेत तासनतास बसायचे...  असेच १९४३ मध्ये राणी बागेत बसले असता वामनदादा कर्डक यांना हिंदी गीताचे विडंबन गीत करायची कल्पना  सुचली नि नेत्यांनी ते गीत लिहिलेही ... हेच गीत त्यांनी ३ मे १९४३ रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवलं ... उपस्थितांनी त्यांची प्रशंसा केली ... टाळ्या वाजवल्या अन  वामन कर्डक कवी झाले...


त्यानंतर २००४ पर्यंत वामनदादा  कर्डक यांनी  गीतलेखनाचे, गायनाचे  कार्यक्रम चालू ठेवले होते ... त्यांच्या अनेक गीतांनी मराठी मानस घडवण्याचं , प्रेरणा देण्याचं आणि आंबेडकरवाद रुजवण्याचं मोठं कामं केलं त्यांना पुन्हा विनम्र अभिवादन ...💐💐💐


                                     यशवन्त भंडारे, 

                                    दि .15 मे ,2022


                           

No comments:

Post a Comment

Pages