दलितांवरील होणारे अन्याय कधी थांबणार? - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 5 September 2022

दलितांवरील होणारे अन्याय कधी थांबणार?


   यावर्षी आपण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले. (१५ऑगस्ट २०२२) भारत देश हा सर्वच क्षेत्रात पुढे जाताना दिसतो. या साऱ्या भौतिक प्रगतीचा या देशातील दलितांना अभिमानच आहे.परंतु या वाटचालीत दलितांवरील अन्याय अत्याचार अजुनही थांबलेले दिसत नाहीत. दलितांवरील होणारे अन्याय हे काही नवीन नाही. फार पूर्वीपासून  अन्यायाचे प्रसंग होत असल्याचे येथे पाहायला मिळते. परंतु स्वतंत्र भारतात ही बाब मोठ्या प्रमाणात घडावी हे या देशाचे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल. देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असताना. या देशातील दलितांना अजुनही आकस भावनेने त्यांच्याकडे पाहिले जात असेल तर या देशाला महासत्ता बनण्याची स्वप्ने पडू नये . कारण एकाला तुपातली पोळी अन् एकाची सदा रिकामी झोळी हे या स्वतंत्र भारतात हिच अवस्था येथे पाहायला मिळते. अजुनही येथल्या ग्रामीण आणि शहरी समाजाचा जातीवंत सापेक्ष चेहरा पुसला गेला नाही. अन्याय होण्यामागे "जात"हा घटक महत्त्वाचा आहे. जात विषमता निर्माण करते. तरीही ही लोक जात विसरत नाहीत. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते . परंतु याच राज्यात दिवसेंदिवस दलितांवरील अन्याय अत्याचार वाढतच आहेत. राज्याने नागरी हक्क संरक्षण अधिनियम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ मध्ये पारित केला. अश्या तरतुदीमुळे अन्याय कमी व्हावेत बंद व्हावेत हा प्रामाणिक हेतु होता . परंतु समाजातील काही वर्गाकडून हे कायदे परस्पर नाकारताना दिसतात. परंतु शासन हे कायदे कडक असुन सुध्दा या कायद्याची अंमलबजावणी करताना हवा तसा दिसुन येत नाही. यामुळे या कायद्याची भिती अन्याय करणाऱ्या वर्गाला राहिलीच नाही असे स्पष्ट दिसते.आजही या देशातील दलितांवरील अन्याय अत्याचाराची मालिका थांबली नाही. कुठे सामाजिक बहिष्कार, कुठे जीवघेणे हल्ले तर कुठे हत्त्या या सारख्या घटना आज उघड उघड पाहायला मिळतात. दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना देशात आज घडीला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की हल्ल्यावर हल्ले करण्याची त्यांना मालिकाच बनवायची आहे असे आता उघडपणे दिसत आहे. हा दलितांवर होणारा अन्याय थांबणार कधी. शतकानुशतके येथल्या शोषित पीडित समाजावर अन्याय चालुच आहे. त्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या चळवळींनी आपला लढा सुरूच ठेवला आहे . "लढ्यावाचून मुक्ती नाही" हे सुत्र त्यांनी जाणुन घेतलं आहे. अन्यायाची परतफेड केल्याशिवाय अन्याय थांबणार नाहीत. हि गोष्ट लक्षात ठेवून येथे मोठा लढा येथे उभारला गेला आहे .या दलितांवरील होणाऱ्या अन्यायाकडे शासन आणि प्रशासन यांनी या लक्ष घालुन या होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या घटनांना आळा बसवला पाहिजे .अन्यथा या पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्याला कलंकित करणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत जातील . कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणात झाल्याशिवाय हा अत्याचार थांबणार नाहित.... 

 - निलेश वाघमारे नांदेड ८१८०८६९७८२

No comments:

Post a Comment

Pages