फुले - आंबेडकर चळवळीतील शोषित सर्व समाज घटकांनी एकत्र येणे,ही काळाची गरज -डाॅ.भालचंद्र कांगो
नांदेड : फुले-आंबेडकरी चळवळीतील सर्व शोषित घटकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे आणि लोकशाहीचे रक्षण करणे ही सगळ्यात मोठी आज आपल्या समोरची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ.भालचंद्र कांगो यांनी केले.
प्रा.सोमनाथ कदम यांनी लिहिलेल्या ग्रंथावर काल(दि.१२) पीपल्स काॅलेजच्या सभागृहात चर्चा सत्र झाले.यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलतांना वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर यांनी महाराष्ट्रातील फुले-आंबेडकरी चळवळीचा सविस्तर मागोवा घेतला. प्रा. सोमनाथ कदम यांनी लिहिलेला आंबेडकरी चळवळीचा नवा इतिहास चळवळीला गतिमान करणार आहे असे मत त्यांनी मांडले .याप्रसंगी किशोर जाधव यांनी सडेतोड मांडणी करताना पारंपरिक काळापासून चालत आलेल्या महार मांग संघर्षाचे सविस्तर स्पष्टीकरण केले. यामध्ये पारंपारिक आणि कट्टरवादी आंबेडकरवाद्यांनी अण्णा भाऊ साठे, मुक्ता साळवे यांच्यावर अन्याय केला आणि मातंग समाजाला सामावून घेण्यात कमी पडल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कम्युनिस्टांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा, प्रतिभेचा फक्त वापर केला त्यामुळे अण्णाभाऊंना कम्युनिस्टांनी न्याय दिला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आज बहुजन समाजाच्या समोर आंबेडकरी चळवळीतील सोमनाथ कदम यांची ही मांडणी ही काळाची गरज आहे या पुढील काळात प्रा. कदम यांनी अधिक सडेतोडपणे चळवळीवर भाष्य करावे, असे त्यांनी मत मांडले.
चर्चा सत्राचे अध्यक्ष बी.एच.का़बळे यांनी अध्यक्षीय समारोपातून सद्यकालीन मातंग समाज आणि आंबेडकरी चळवळ व बहुजन वंचित आघाडी यावर भाष्य केले. आंबेडकरी चळवळीतील मातंग समाजाचे वाढते प्रमाण हे चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ असून समाजाच्या भल्यासाठी हेच आवशक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ. दिलीप चव्हाण, बालाजी थोटवे, लोकवांङम॒यगृह प्रकाशन व सर्व नांदेडच्या टीमने परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment