किनवट / माहूर : अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे . नुकसानग्रस्त भागाची खासदार हेमंत पाटील यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनास दिले . तर शेतकऱ्यांना नुकसानीची भरीव मदत मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारकडे पाठपुरावा करणार असून , अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व भागात जरी जाता आले नसले तरी त्या भागातील नुकसानीचा आढावा घेतला असून त्याभागाचे सुद्धा पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .
परतीच्या पावसाने सगळीकडे हाहाकार उडवला असून अगोदरच कोरोना विषाणूच्या संसर्गाने हवालदिल असलेला बळीराजा निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरता खचून गेला आहे . मान्सूनच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने पीक जोमदार येऊन बळीराजा सुखावला होता. परंतु नंतर पावसाचा जोर वाढत गेला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग ,उडीदाचे पीक हिरावले गेले . शेतकऱ्यांचे खरिपातील एकमेव नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकांवर भिस्त असताना परतीच्या पावसाने मात्र हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वदूर अतिवृष्टी आणि ढगफुटी होऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . शेतशिवारात सगळीकडे पावसाचा जोर वाढून नद्या नाल्याना पूर आला. यामध्ये शेतात जमा केलेले पीक सुद्धा वाहून गेले. यासर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी तातडीने दौरा केला . तत्पूर्वी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्याची कृषी आढावा बैठक घेऊन तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि प्रशासन व पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते .
खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावून मतदार संघाचा दौरा केला. यामध्ये त्यांनी पीकविमा प्रश्नावर अधिकाऱ्याना धारेवर धरून प्रत्येक तालुका स्तरावर विमा कंपनीचे कार्यालय येत्या आठवडाभरात सुरु करण्याच्या सूचना दिल्या.तसेच हिंगोली ,कळमनुरी , मुळावा ,गौळ बाजार या ठिकाणी अतिवृष्टी शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला . हिंगोली आणि औंढा आणि कळमनुरी पाठोपाठ किनवट, माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने खासदार हेमंत पाटील यांनी धामनधरी , सतीगुडा, मुरळी ,गोकुळ गोंडेगाव , टाकळी , वडसा ,पलाईगुडा, अंबाडी यासह इतर भागातील नुकसानग्रस्त सोयाबीन ,कापूस पिकाची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळवून द्यावी असे निर्देश किनवट सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण कुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे,अँड.रमण जायभाये,देवकुमार पाटील, तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक,तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे,माहूर पं. स.उपसभापती उमेश जाधव,पं.स.सदस्य नामदेव कातले,माहूर शहरप्रमुख निरधारी जाधव,माहूर न.प.गटनेता दिपक कांबळे, शिवसेना शहरसंघटक सुरेश आराध्ये, युवासेना तालुकाप्रमुख विकास कपाटे,रुपेश कोपे,गजानन बच्चेवार, राजाराम गंदेवाड,यांच्यासह आदी उपस्थित होते .
No comments:
Post a Comment