किनवट : सध्या देशाचा 20 टक्के खर्च हा बाहेरील देशातील इंधन आयात करण्यासाठी होत आहे. माजी राष्ट्रपती स्वर्गीय ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी आपल्या देशात नैसर्गिकरित्या इंधन तयार करण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाची संकल्पना पुढे आणली, त्या माध्यमातून जैविक इंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू होत आहे. असाच प्रकल्प किनवट तालुक्यात सुरू होत आहे.मीरा क्लिन फ्युल व गव्हाणे बायो फ्युल यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 50 कोटी पासून 500 कोटी पर्यंत चा जैविक इंधन निर्मितीचा प्रकल्प (नैसर्गिक गॅस निर्मिती )मौजे राजगड तांडा येथे उभा केला जाणार आहे अशी माहिती गव्हाणे बायो फ्युलचे अध्यक्ष विनायक मारोतराव गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे .
या प्रकल्पामुळे किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक हित साध्य होणार असून संपूर्ण किनवट तालुका प्रदूषणमुक्त करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याबरोबर त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे या भागातील अडीच हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शेतामधील ओल्या कचऱ्यापासून जैविक इंधन तयार करण्यात येणार आहे. शेतातील पलट्या, तुराट्या, बांबू ,नेपियर गवत, शेण तसेच टाकाऊ कचरा घेतला जाणार आहे.
जैविक इंधन निर्मितीसाठी दगड ,लोखंड व काच सोडल्यास शेतकऱ्यांच्या शेतात जो कचरा किंवा गवत( सुपर नेपियर ) नगरपालिका व ग्रामपंचायतीकडे जो जमा होणारा कचरा आहे त्याचाही उपयोग होणार आहे. या प्रकल्पासाठी प्रामुख्याने जे गवत सुपर नेपियर लागणार आहे. त्याचबरोबर गजराज, गिनिगोल व सुपर नेपियर नावाचे गवत शेतकऱ्यांना देऊन वर्षभरातून या गवताच्या माध्यमातून एका एकरला सुमारे दीड ते अडीच लाख रुपयांचा खर्च वजा जाता उत्पन्न देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे सेंद्रिय खत देऊन त्यांच्याकडून सेंद्रिय शेती करून घेण्यात येईल व त्यांनी उत्पादीत केलेल्या शेतीमालाला हमीभाव देऊन त्यांच्याकडून कंपनी विकत घेईल, त्याचबरोबर ज्यांच्याकडे शेती नाही अशा व्यक्तींना दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व शेळीपालनाची शेतीशी निगडित विविध उद्योग उभारून देऊन त्यांचा माल पण कंपनी हमी भावाने विकत घेणार आहे.
प्रकल्पाच्या एकूण नफ्यातील सुमारे 20 टक्के नफा हा सामाजिक,शैक्षणिक ,आरोग्य व विविध सुविधांसाठी तालुक्यातच खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून दर्जात्मक शिक्षणाची उभारणी ,चांगली आरोग्याची सुविधा मिळावी म्हणून स्वत दरातील सुसज्ज रुग्णालय निर्मिती, क्रीडा संकुल व प्रत्येक गावात वाचनालय यावर भर असणार आहे.इंधनासाठी लागणारे गवत शेतकऱ्यांकडून हजार रुपये टन दराने विकत घेतला जाणार आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्राम प्रकल्प उभारण्यात येणार आहे .त्यामुळे तेथील ग्राम प्रकल्पांमध्ये किमान दहा कर्मचारी काम करतील.
एकंदरीत या प्रकल्पामुळे पेट्रोल आणि डिझेल ला पर्याय उपलब्ध होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार तर आहेच पण पर्यावरण संतुलन ,तालुक्याचा विकास ,रोजगार निर्मिती, सेंद्रिय अन्नधान्य निर्मितीसाठी प्रोत्साहन, शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ आदि गोष्टी साध्य होणार आहेत. अशी माहिती विनायक गव्हाणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक बालाजी पाटील मुरकुटे ,चंपतराव जाधव, मारोती दिवसे पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment