किनवट, दि.29, : दुर्गम भागातील पैनगंगेच्या काठी अवैधरित्या सागवानाच्या पाट्या काढण्याच्या कामासह देशी दारू गाळण्याचे काम चालू असतांना,खरबी (वन्यजीव) वनविभाग व किनवटच्या वनविभागाचे फिरते पथक यांनी संयुक्तरित्या धाड मारून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सागवान लाकूड व गावठी दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले. ही कारवाई शनिवारी (दि.28) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.
नांदेड-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषवरून पैनगंगा नदी वाहते. पूर्वेस किनवट शहर तर पश्चिमेस खरबी गाव असून, तिथूनच पैनगंगा अभयारण्यास सुरुवात होते. निबिड जंगलातील पैनगंगेच्या काठावर गावठी दारू गाळल्या जात असून, शेजारीच सागवानाचे मोठे वृक्ष तोडून त्याच्या पाटल्या काढल्या जात असल्याची गोपनीय माहिती खबर्याने खरबीचे वनक्षेत्रपाल नितीन आटपाडकर यांना शनिवारी सकाळी दिली. त्यांनी पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वनअधिकारी सुभाष पुराणीक, सहायक वनसंरक्षक रविंद्र कोंडावार आणि किनवटचे वनविभागाचे उपवनसंरक्षक गणेश गिरी यांना याबद्दलची माहिती देऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर, किनवट फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल योगेश शेरेकर यांचा ताफा व स्वत:च्या वनकर्मचार्यांसह घटनास्थळी पोहोचून अचानक छापा मारला. मात्र, चाहूल लागल्यामुळे वनतस्करांनी लगोलग पसार झाले. घटनास्थळी सापडलेला सुमारे सव्वालाख रुपयांचा सागीमाल व दारूभट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले. दारुभट्टीच्या साहित्याच्या आधारे सागीतस्करांचा शोध घेणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
या कारवाईत बोरीचे वनपाल गजानन मोरे, वनरक्षक विजेंद्र सोनोने, वैभर घोरपडे, वनमजूर भाऊसिंग जाधव व वांहनचालक बाळकृष्ण आवळे आदींचा सहभाग होताा.
No comments:
Post a Comment