दिल्ली :
भारताने शनिवारी झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत टी-२० विश्वचषकावर विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरात आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींनी हा विजय मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे.
या विजयानंतर भारतीय क्रिकेटच्या दोन दिग्गज खेळाडूंनी, विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयसीसीच्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून या निवृत्तीच्या घोषणांची माहिती देण्यात आली.
टी-२० विश्वचषकातील विजयानंतर विराट कोहलीने प्रथम निवृत्ती जाहीर केली. त्याच्या पाठोपाठ भारतीय कर्णधार रोहित शर्माने देखील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहितने पत्रकार परिषदेत सांगितले की, "आजचा सामना माझा शेवटचा सामना होता. टी-२० क्रिकेटला अलविदा म्हणायला आजच्या सारखा दुसरा चांगला दिवस नाही. टी-२० विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे."
रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीतील विक्रमांबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी ३२.०५ ची सरासरी आणि १४०.८९ च्या स्ट्राइक रेटने ४२३१ धावा केल्या आहेत. त्याने या सामन्यांमध्ये ५ शतक आणि ३२ अर्धशतक ठोकले आहेत. रोहित २००७ साली टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही सदस्य होता.
या दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक नव्या युगाची सुरुवात होणार आहे. त्यांच्या योगदानामुळे भारतीय क्रिकेटची नवी उंची गाठली आहे आणि या दोघांची कमी भारतीय क्रिकेट रसिकांना नेहमीच जाणवणार आहे.
No comments:
Post a Comment